गावांमध्ये थांबणार कार्यकर्ते – प्रभातफेरींचे करणार आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसने जनजागृती मोहिमेच्या अंतर्गत महागाईच्या विरोधात व्यापक सतरावर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते गांधी टोपी घालून पदयात्रा करतील. पक्षाच्या एआयसीसी मुख्यालयात बुधवारी काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. महागाईच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते प्रभातफेरी काढणार असल्याचे या नेत्यांनी सांगितले.
पक्षाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, रणदीप सिंह सुरजेवाला आणि के.सी. वेणुगोपाल सहभागी झाले. पक्ष 14 ते 29 नोव्हेंबरपर्यंत जनजागृती मोहीम चालविणार आहे. आम्ही महागाईच्या विरोधात निदर्शने करत देशभरात पेट्रोल पंपांवर विरोध दर्शविला. काँग्रेस कार्यकर्ते पदयात्रा काढून रात्री गावातच वास्तव्य करणार असल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले आहे.
पक्ष स्वतःचा आवाज लोकांपर्यंत पोहोचविणार आहे. अर्थव्यवस्था बिघडल्याने देशातील कुटुंबांना स्वतःचे बजेट सावरताना अडचणी येत आहेत. आम्ही आमचा आवाज प्रत्येकापर्यंत पोहोचवू शकू असा विश्वास असल्याचे उद्गार दिग्विजय यांनी काढले आहेत. पक्षाने आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेतृत्वाला प्रभाग तसेच गाव पातळीवरील लोकांपर्यंत पोहोचण्याची सूचना केल्याचे समजते.
काँग्रेस पक्ष पेगॅससच्या कथित वापराचा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचे काँगेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच सांगितले आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान पेगॅससचा कथित वापर, कृषी कायदे, महागाई समवेत अनेक मुद्दय़ांवर काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष सरकारला लक्ष्य करू शकतात.