नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किंमती आणि डिझेल-पेट्रोलच्या वाढलेल्या दरांप्रश्नी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तेलाच्या किमती वाढवून सरकारने सर्वसामान्यांना थेट दुखावले आहे, असे ते म्हणाले. महागाईच्या मुद्यावर काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर बचावार्थ भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला.
देशातील वाढत्या किरकोळ महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. त्यातच आता स्वयंपाकाचा गॅस महागल्यामुळे देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. या दरवाढीच्या मुद्दय़ाला धरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी उपरोधिक भाषा वापरत केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. सरकार ‘जीडीपी’ वाढल्याचा दावा करत आहे. हे ‘जीडीपी’ म्हणजे ‘गॅस, डिझेल, पेट्रोल’ असून सरकारने या तिघांच्या किमती गेल्या 7 वर्षात प्रचंड वाढवल्या आहेत. सरकारला या ‘जीडीपी’तून 23 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. हे पैसे गेले कुठे? असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केला.
राहुल गांधी देशाला गोंधळात टाकतात ः पात्रा
सरकारचा बचाव करताना संबित पात्रा यांनी जीडीपीची चुकीची व्याख्या देऊन राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत. हे लोक ‘जीडीपी’चा खरा अर्थ कधीच समजू शकत नाहीत. नोटाबंदी झाल्यापासून राहुल गांधी नेहमीच त्रासलेले दिसतात असे सांगत नोटाबंदीमध्ये गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षाने बराच पैसा गमावला असावा, असा तर्कही त्यांनी वर्तवला.
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमतीत झालेल्या वाढीवरून काँग्रेस सरकारवर सतत हल्ला करत आहे. पेट्रोलियम पदार्थांवरील कर कमी करून सरकारने या उत्पादनांच्या किंमती कमी कराव्यात, अशी पक्षाची मागणी आहे. याआधी राहुल गांधी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किमतींविरोधात सायकल चालवून संसद गाठली होती. महागाईच्या विरोधातही विरोधकांनी अनेक वेळा रस्त्यावर उतरून निषेध केला आहे.