बेळगाव : महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. एक टन ऊस विकल्यानंतर खाद्यतेलाचा एक डबा येत आहे. 5 लिटर दूध विक्री केल्यानंतर दोन लिटर पेट्रोल मिळत आहे. यावरून देशाची अवस्था काय झाली असेल, हे दिसून येते. 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र, हे 20 लाख कोटी कोणत्या घटकाला दिले हे अद्यापही समजले नाही. त्यासाठी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी सुराज्य निर्माण आंदोलन संघटनेच्यावतीने राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता विविध समस्यांना तोंड देत आहे. 90 टक्के व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोणत्याच प्रकारची मदत करण्यात आली नाही. उद्योगांबरोबरच नोकऱयाही गेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. असे असताना केंद्र सरकार त्याबाबत पाऊल उचलण्यास तयार नाही. तेव्हा राष्ट्रपतींनी आता हस्तक्षेप करून देशातील महागाई आटोक्यात आणावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजन हुलबत्ते, प्रशांत कुलकर्णी, दस्तगीर आगा, इब्राहिम समशेर, फारुख हिप्परगी, ए. एम. लोदी, समीउल्ला अवटी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.