‘महागाईमुक्त भारत’ अभियान : राहुल गांधींचीही उपस्थिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील सतत वाढत चाललेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि महागाईबाबत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे. पक्षाने त्याला ‘महागाईमुक्त भारत’ अभियान असे नाव दिले आहे. 31 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत तीन टप्प्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. गुरुवारी राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील विजय चौकात धरणे आंदोलन केले. दिल्लीबरोबरच राज्यात अन्य विविध राज्यांमध्येही स्थानिक पातळीवर आंदोलन करण्यात आले. तसेच संसदेतही काँग्रेस नेत्यांसह अन्य विरोधी पक्षही इंधन दरवाढीला विरोध करत आहेत. या मुद्दय़ावर गुरुवारी सभागृहाचे कामकाज ठप्प झाले होते.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गुरुवारी दिल्लीतील विजय चौकात केलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी सरकारच्या विरोधात ‘शर्म करो, शर्म करो’ अशा घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान नेत्यांनी गॅस सिलिंडर व दुचाकींना पुष्पहार घालून वाढत्या इंधन दराचा निषेध केला. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नऊवेळा वाढल्या आहेत. यावर सरकारने नियंत्रण ठेवावे अशी आमची मागणी असल्याचे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी सिलिंडरला पुष्पहार अर्पण केला. देशभरात काँग्रेसने तीन टप्प्यात ‘महागाईमुक्त भारत अभियान’ सुरू केले आहे. त्याअंतर्गत देशभरात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींविरोधात पक्षातर्फे आंदोलन करण्यात येत आहे.
‘पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्या की, इंधनाच्या किमतीही वाढतील याची पूर्वकल्पना आम्हाला पूर्वीपासूनच होती’, असे काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले. इंधनाचे वाढलेले दर मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांना किती त्रास सहन करावा लागतोय हे सरकार समजू शकत नाही, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.