प्रतिनिधी /बेळगाव
महागाईमुळे देशातील जनता होरपळून निघाली आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. भाजप सरकार अपयशी ठरले असून केंद्र सरकारने तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. कित्तूर चन्नम्मा चौक येथे निदर्शने करून ही मागणी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
आहे.
भाजप सरकारने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. निवडणुकीवेळी अनेक आश्वासने दिली. मात्र आता ती आश्वासने पाळण्याकडे दुर्लक्ष केले आहे. महागाईने तर कहर केला आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. दररोज पेट्रोलचा दर वाढत आहे. मात्र या दरवाढीबाबत केंद्र सरकार एक चक्कार शब्दही काढण्यास तयार नाही. त्यामुळे हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून तातडीने या सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे.
कित्तूर चन्नम्मा चौक येथे सिलिंडर घेवून निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, ऍड. सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.