ऑनलाईन टीम / रायपूर :
एकीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच दुसरीकडे महागाईने कळस गाठला आहे तर पेट्रोल – डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. त्यामुळे जनतेसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत भाजप नेत्याने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
छत्तीसगड सरकारमध्ये तीन वेळा मंत्री झालेले भाजपचे आमदार बृजमोहन अग्रवाल यांनी वाढत्या महागाईवरून मुक्ताफळे उधळली आहेत. ज्यांना महागाई संकट वाटते त्यांनी खाणे – पिणे सोडून द्यावे, आणि पेट्रोल – डिझेल देखील वापरू नये, त्यामुळे महागाई कमी होईल. तसेच ज्यांनी काँग्रेसला मत दिले आहे, त्यांनी जरी हे काम केले तरी महागाई आटोक्यात येईल.
- काँग्रेसचा पलटवार
त्यांच्या या वक्तव्यावर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुशील आनंद शुक्ला यांनी पलटवार केला आहे. सुशील आनंद शुक्ला यांनी ट्विट करत सांगितले की, हा भाजप आमदारने दिलेला निर्लज्जपणाचा सल्ला आहे. लोकांनी खाणे पिणे सोडले, पेट्रोल डिझेल वापरणे सोडले तर म्हणे महागाई कमी होईल.
पुढे ते म्हणाले, हा बृजमोहन अग्रवाल यांचा निर्लज्जपणाचा कळस आहे. वाढत्या महागाईने मध्यम वर्ग आणि गरीब जनता त्रस्त आहे. केंद्र सरकारच्या या फायदेशीर धोरणामुळे लोकांच्या घरातील स्टो विझत आहेत आणि भाजप नेत्या चे असे विधान म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे, असे म्हटले आहे.