तब्बल 1 लाख 13 हजार जणाना टुचुक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांचे परफेक्ट नियोजन
प्रतिनिधी / सातारा
बुधवारी राज्य शासनाच्यावतीने राज्यात महाटुचुक अभियान राबविण्यात आले. त्या अभियानात सकाळपासूनच सातारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता तो सायंकाळी उशिरापर्यत. जिल्ह्यातील 1 लाख 13 हजार जणांनी टुचुक केले आहे. महाटुचुक अभियान यशस्वी राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांचे परफेक्ट नियोजन आणि आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यानी घेतलेली मेहनत महत्वाची ठरली आहे. त्यामुळे गाव पातळीवर हे अभियान यशस्वी राबविण्यामध्ये आशा वर्कर यांचा मोलाचा वाटा आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महा टुचुक अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी राज्यात हे अभियान राबविण्यात आले. आरोग्य विभागाने तसे आवाहन केले होते. सातारा जिल्ह्यातील अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी सूचना दिल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विनय गौडा यांच्या आदेशानुसार आराखडा आखला गेला. अन जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा लसीकरण मोहिमेवर नेमली. त्यामध्ये आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी महत्वाचे काम पार पाडले.
बुधवारी सकाळपासून जिल्ह्यातील 471 लसीकरण केंद्रावर 1लाख 13 हजार 629 जणांना लस देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत टूचुकचे लाभार्थी 20 लाख 73हजार 426 एवढे झाले आहेत. त्यामध्ये पहिला डोस घेतलेले 14लाख 85हजार 499 तर दुसरा डोस घेतलेले 5 लाख 87हजार 927जण झाले आहेत.