ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अंदमानच्या तुरुंगात कैद असताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच विनायक सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका दाखल केली होती. पण काही मुठभर लोकांनी त्यांना बदनाम केले. त्यांचे राष्ट्रासाठीचे योगदान नाकारता येणारे नाही. त्यामुळे त्यांच्यावरील टीका यापुढे सहन केली जाणार नाही, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर हु कुड हॅव प्रीवेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात राजनाथ सिंह बोलत होते. ते म्हणाले, सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी होते, भविष्यातही असतील. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल मतभेद असतील. पण, त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान नाकारता येणार नाही. सावरकरांची नाझी किंवा फॅसिस्ट म्हणून केली जाणारी टीका योग्य नाही. एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित झालेला गट सावरकरांच्या जीवन आणि विचारधारेपासून अपरिचित आहे आणि त्यांना सावरकरांची योग्य समज नाही. त्यामुळे ते सावरकरांवर टीका करतात. यापुढे अशा प्रकारची टीका सहन केली जाणार नाही.