भाजपचा दावा, देशभर जनजागृतीचे कार्य बळकट केले जाणार
पाकिस्तानात हिंदू आणि शीखांवर अत्याचार होत असतील तर त्यांना भारताने जवळ केले पाहिजे. हे लोक भारतात येऊ इच्छित असतील तर त्यांना भारतात सन्मान मिळाला पाहिजे. तसेच त्यांच्या अधिकारांचे संरक्षण झाले पाहिजे. अशी इच्छा महात्मा गांधींनीही व्यक्त केली होती. मोदी सरकारने संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून हीच इच्छा पूर्ण झाली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाने केले आहे. तसेच या कायद्याबद्दल जनजागृती मोहिमेचा प्रारंभ झाला असून उत्तरोत्तर ही मोहीम अधिक बळकट करण्याची योजना असल्याचे पक्षाने म्हटले आहे. पक्षाची ही भूमिका मध्यप्रदेशातील ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी स्पष्ट केली.
शुक्रवारी पक्षाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. सरकारने सध्या राष्ट्रीय नागरिकत्व सूचीचा कार्यक्रम काही काळ पुढे ढकलला आहे. मात्र, अशा सूचीची देशाला आवश्यकता असून या संदर्भातील नियम लवकरच स्पष्ट करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय नागरिकत्व सूचीचा धर्माशी संबंध नसून देशातील वैध नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही योजना आवश्यक असल्याचेही पक्षाने म्हटले आहे.
आपल्या देशात कोण रहात आहे? देशात वास्तव्य करणाऱयांपैकी वैध नागरिक किती आणि अवैध नागरिक किती? हे जाणून घेणे हा आपला अधिकारच आहे. मोदी सरकार त्याचीच अंमलबजावणी करीत आहे. वास्तविक या योजनेला विरोध होण्याचे कोणतेही कारण नाही. तरी काही विरोधी पक्ष हेतुपुरस्सर गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत असून लोकांनी दिशाभूल करून घेऊ नये, असे आवाहनही विजयवर्गीय यांनी केले.
सध्या देशात नव्या नागरीकत्व कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांनी आंदोलने चालविली आहेत. तर भाजपच्या वतीने समर्थनार्थ प्रतिआंदोलन करण्यात येत आहे.