प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरातील रस्ते स्मार्ट बनवण्यासाठी हजार कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र या अंतर्गत काही ठरावीक रस्त्यांचा समावेश करण्यात आल्याने शहरातील मुख्य रस्ते विकासापासून वंचित आहेत. नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर करण्यात आलेल्या महाद्वार रोड मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे खडी टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत, पण सदर खड्डे वाहनधारकांना जीवघेणे बनले आहे. रस्त्यावरील खडीवर डांबर घालण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
कपिलेश्वर मंदिर ते जुना धारवाड रोडपर्यंतच्या महाद्वार रोडचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आले होते. रस्ता केलेल्या काही महिन्यातच डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली. त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली पण दुरूस्तीचे काम व्यवस्थित झाले नसल्यामुळे रस्त्याच्या मधोमध खोदण्यात आलेल्या चरीमुळे रस्ता कायमचा खराब झाला आहे. वारंवार चरीमधील माती खाली जात असल्याने तसेच खड्डे पडत असल्याने रस्ता खराब होत आहे.
खोदण्यात आलेल्या चरी व्यवस्थित बुजविण्यात महापालिका अपयशी ठरले आहे. त्यामुळे हा रस्ता खूपच खराब झाला आहे. रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले असल्याने खड्डय़ांमध्ये खडी घालून बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण यामुळे नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोयीचे बनले आहे. खड्डे मोठे असल्याने खडी व्यवस्थित बसत नाही. ये-जा करणाऱया वाहनांमुळे खडी रस्त्यावर पसरली आहे.
खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकी वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी व्यवस्थित करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.