जागतिक संकटे निसर्गनिर्मित असोत किंवा मानवनिर्मित, ती काहीतरी संदेश देऊन जातात. या संकटाच्या संधीतून माणसाची प्रगती होते. कोरोनाच्या या जागतिक संकटामधून शहरांचा विस्तार किंवा लोकसंख्या हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधीजीनी खेडय़ाकडे चला हा संदेश सर्वांना दिला. परंतु जागतिकीकरणाच्या लाटेत तो विरून गेला. श्रीमंत अधिक श्रीमंत या न्यायाप्रमाणे स्वातंत्र्यानंतर मोठी शहरे अधिक मोठी झाली. महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास स्वातंत्र्यानंतर गेल्या साठ सत्तर वर्षानंतर पुण्या-मुंबईने मूळचे स्वरूप पालटून ती केवळ औद्योगिक केंद्रे बनली. त्यानंतर विस्तारलेली शहरे म्हणजे नाशिक, औरंगाबाद, नागपूर रोजगाराच्या संधी पुण्या-मुंबईमध्ये एकवटल्यामुळे खेडी ओस पडून उदरनिर्वाहासाठी लोक शहरामध्ये येऊ लागले. स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजनीती व अर्थनीतीने शहराचा विस्तार किती व्हावा याचा कधीच विचार केला नाही. स्मार्ट व्हिलेज निर्माण करण्याऐवजी आपण स्मार्ट सिटी निर्माण करण्यात धन्यता मानू लागलो.
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीमधून साखर कारखाने निर्माण झाले असून खेडय़ापाडय़ातील लोकांना रोजगार निर्माण झाला आहे. पुण्या-मुंबईच्या मानाने तो नगण्य आहे. 1980 च्या दशकामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एक चांगला निर्णय घेतला तो म्हणजे खेडय़ातून अभियांत्रिकी महाविद्यालये वाढण्यास चालना दिली. परंतु यामधून निर्माण होणाऱया अभियंत्यानी उपजीविकेसाठी पुण्या-मुंबईमध्येच गर्दी केली. अशा अभियांत्रिकी महाविद्यालयांमुळे त्या त्या खेडय़ातील परिसराचा किती औद्योगिक विकास झाला हा मोठा संशोधनाचा विषय ठरेल.
मुंबईमधील धारावी परिसरातील झोपडपट्टय़ांमध्ये दोन चौ. किलोमीटरच्या परिसरामध्ये सुमारे दहा लाख लोक राहतात. अशा ठिकाणी सामाजिक अंतर (एदम्ग्aत् एtaहम्ग्हु) राखून कोरोना कसा हटविणार? कमी क्षेत्रामध्ये लाखो लोक राहण्यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान हा एक वेगळा प्रश्न आहे. एकीकडे गगनचुंबी इमारती व दुसरीकडे झोपडय़ांचे साम्राज्य असे विषमतेचे विदारक सत्य मोठय़ा शहरातून पहावयास मिळते. या संदर्भात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांनी व्यक्त केलेली नाराजी बरेच काही सांगून जाते.
एके ठिकाणी असंख्य लोक एकत्र आल्यामुळे बांधकाम क्षेत्रास मिळालेली उभारी व त्यातून बांधकाम नियमांची झालेली पायमल्ली व सामान्यांचे झालेले शोषण, या क्षेत्रातील उपजीविकेसाठी लाखो परप्रांतिय मजुरांनी पुण्या-मुंबईमध्ये स्थलांतर केले. सामान्य माणसाला न परवडणाऱया घरामुळे धारावीसारख्या झोपडपट्टय़ा निर्माण झाल्या. वाहतुकीची झालेली कोंडी व त्यातून पुन्हा उड्डाण पूल व मेट्रोची योजना. पुन्हा दोन मोठय़ा शहराचा विकास होण्यासाठी बुलेट ट्रेनची आवश्यकता. असे शहराच्या विकासाचे न संपणारे चक्र आहे. परंतु यातून मोठी शहरे अधिक मोठी झाली.
मोठय़ा शहरातील अधिक लोकसंख्येमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाले असे कोणीच म्हणणार नाही. परंतु अधिक लोकसंख्येमुळे प्रशासनास त्यावर ताबा मिळविणे कठीण झाले आहे. इतर राज्यांपेक्षा औद्योगिक प्रगती केलेल्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये इतर शहरांपेक्षा जास्त लोकसंख्या धनता असलेल्या मुंबई-पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. शरीरामध्ये रक्त सर्वत्र फिरते, म्हणूनच शरीराचे आरोग्य चांगले राहते. हा नैसर्गिक नियम औद्योगिक व अर्थ क्षेत्रालाही लागू आहे. औद्योगिक व विकासाच्या नावाखाली शहरांची लोकसंख्या व विस्तार किती वाढणार हा प्रश्न पूर्वीही महत्त्वाचा होता व उद्याही तो असणार आहे. फक्त कोरोना संकटामुळे त्याची तीव्रता जाणवते इतकेच. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या सुखसोयी लहान शहरे व खेडय़ापर्यंत पोहचल्या तरी मोठय़ा शहराकडे उपजीविकेसाठी जाणाऱया लोकांचा लोंढा थांबला नाही. कारण तसे नसते तर देशातील ठाणबंदीनंतर हजारो लोक आपल्या गावी जाण्यास निघाले नसते. कोरोनानंतरचे जग हे पूर्णपणे बदललेले असणार आहे. आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रामध्ये नव्याने मांडणी करावी लागणार आहे. घरामधून काम, घरामधून शिक्षण ही नवीन संकल्पना उदयास येत आहे. खरा प्रश्न आहे तो म्हणजे औद्योगिक व आर्थिक विकेंद्रीकरणाचा व त्यानुसार मोठय़ा शहरातील लोकसंख्या विस्तार, प्रदूषण, नागरी समस्या, आरोग्य समस्या, वाहतुकीच्या समस्या, बकाल वस्त्या यावर नियंत्रण ठेवण्याचा.
कोरोना या रोगाची सुरुवात प्रथमतः चीनमधील वुहान शहरामध्ये झाली. जागतिकीकरणामुळे सर्व राष्ट्रांच्या भौगोलिक सीमा रेषा पुसट झाल्यामुळे व या रोगाचा वाहक माणूस असल्यामुळे हा रोग जगभर पसरण्यास वेळ लागला नाही. पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये या रोगामुळे होणाऱया मृत्यूंची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे चीनबद्दल जगभर संतापाची लाट आहे. चीनमधील हजारो कंपन्या भारतामधील औद्योगिक व आर्थिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू इच्छितात. त्यामुळे कोरोनानंतरच्या जगामध्ये भारताला आर्थिक महासत्ता बनण्याची संधी आहे. औद्योगिक व आर्थिक विकासाची संधी लहान शहरामध्ये व खेडय़ामध्ये विकसित केल्यास महानगरामधील लोकसंख्या व विस्तार व त्या अनुषंगाने निर्माण होणाऱया प्रश्नांची तीव्रता कमी होईल.
प्रा. डॉ. भगवान वालवडकर, सांगली