ऑनलाईन टीम / चंदीगड :
भारताचे महान हॉकीपटू आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते बलबीर सिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज सकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी निधन झाले. ते 96 वर्षांचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर सिनियर यांना 8 मे रोजी तब्येत बिघडल्याने मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा पासून ते व्हेंटिलेटर वरच होते. त्यांना तीन वेळा हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्यांची तब्येत अधिकच बिघडली, अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बलबीर सिनियर हे सेक्टर 36 चंदीगडमध्ये मुलगी कुखबीर कौर आणि नातू कबीर बरोबर रहात होते.
बलबीर सिनियर यांचा लंडन ऑलिम्पिक 1948, हेलसिंकी ऑलिम्पिक 1952 आणि मेलबर्न ऑलिम्पिक 1956 अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात समावेश होता. 1975 साली मलेशिया झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. तर 1956 मध्ये त्यांनी मेलबन ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत संपूर्ण स्पर्धेत त्यांनी 38 गोल केले होते. विशेष म्हणजे बलबीर सिनियर यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.