तीन ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे साक्षीदार : भारतीय हॉकी क्षेत्रातील देदीप्यमान पर्वाची सांगता, क्रीडा वर्तुळावर शोककळा
चंदिगढ / वृत्तसंस्था
भारतीय हॉकीमधील सर्वात महान खेळाडूंपैकी एक असलेल्या व तीन ऑलिम्पिक सुवर्णपदकांचे साक्षीदार ठरलेल्या बलबीर सिंग सिनियर यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागील दोन आठवडय़ांपासून ते अनेक आजारांशी झुंजत होते. सोमवारी सकाळी 6.15 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. निधनसमयी ते 96 वर्षांचे होते.
बलबीर सिंग सिनियर यांच्या पश्चात कंवलबीर, करणबीर व गुरबीर अशी तीन मुले व एक कन्या असा परिवार आहे. त्यांची तिन्ही मुले कॅनडात स्थायिक असून ते स्वतः आपल्या कन्येकडे रहात होते. दि. 8 मे रोजी मोहालीतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले होते. इस्पितळाचे संचालक अभिजीत सिंग यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.
तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे साक्षीदार ठरलेले बलबीर सिंग सिनियर दि. 18 मे पासून सेमी-कोमा सदृश स्थितीत होते. मेंदूत रक्ताची गुठळी झाल्याचेही निष्पन्न झाले होते. प्रारंभी खूप ताप असताना ब्रॉन्कायल न्युमोनियावरील उपचारासाठी त्यांना इस्पितळात दाखल करुन घेण्यात आले. त्यांची कोव्हिड-19 चाचणीही करण्यात आली. पण, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. उपचारादरम्यान सिंग यांना हदयविकाराचे तीन झटके आले व उत्तरोत्तर त्यांची तब्येत बिघडतच गेली.
ऑलिम्पिक हॉकीतील अंतिम सामन्यांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक गोलचा बलबीर सिंग सिनियर यांच्या खात्यावरील विक्रम आजही अबाधित आहे. त्यांनी 1952 हेलसिंकी स्पर्धेतील हॉलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात तब्बल 5 गोल केले आणि भारताने ती लढत 6-1 अशा फरकाने जिंकली होती. 1957 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने सन्मानित केले जाणारे ते पहिले ऍथलिट ठरले होते. लंडन (1948), हेलसिंकी (1952) या स्पर्धेत उपकर्णधार या नात्याने तर मेलबर्न (1956) येथे कर्णधार या नात्याने त्यांनी भारताला तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकून दिली. 1975 मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला, त्यावेळी ते संघाचे व्यवस्थापकही होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अवघ्या क्रीडा विश्वावर शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी हॉकी कर्णधार अजित पाल सिंग, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांच्यासह विरेन रास्क्विन्हा, सरदार सिंग, पीआर श्रीजेश, महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल, भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली, अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर, महान ऍथलिट पीटी उषा, नेमबाज हिना सिद्धू, राष्ट्रकुल सुवर्णजेता मुष्टियोद्धा अखिल कुमार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
दोन हिरे जे कधीच एकत्र खेळले नाहीत!
बलबीर सिंग सिनियर यांची खेळावरील हुकूमत ध्यानचंद यांच्या तोलामोलाचीच होती. भारतीय हॉकी वर्तुळातील हेच डोळे दिपवून टाकणारे दोन महान हिरे. पण, आश्चर्य म्हणजे हे दोघेही कधीच एकत्रित खेळले नाहीत. ध्यानचंद ब्रिटीशांच्या राजवटीत खेळल्याने अधिक प्रकाशझोतात राहिले, त्यांची अधिक चर्चा झाली. पण, बलबीर सिंग सिनियरही कामगिरीच्या बाबतीत फारसे मागे अजिबात नव्हते. 1924 मध्ये पंजाबमधील हरिपूर खालसा येथे जन्म असलेल्या बलबीर सिंग यांची गुणवत्ता हरबैल सिंग यांनी हेरली. हरबैल सिंग हे खालसा महाविद्यालयाचे प्रशिक्षक होते. 1952 हेलसिंकी व 1956 मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने लागोपाठ सुवर्ण जिंकले, त्यावेळी हरबैल हेच संघाचे प्रशिक्षकही होते.
भारतरत्नने सन्मानित करण्याची चर्चा
ध्यानचंद यांच्याप्रमाणेच बलबीर सिंग सिनियर यांनाही भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले जावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आली असून अगदी अलीकडे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधत लेखी निवेदनही दिले होते.
कोटस
बलबीर सिंग यांनी केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर उत्तम मार्गदर्शक, प्रशिक्षक म्हणूनही वेगळा ठसा उमटवला. त्यांनी देशाला जागतिक स्तरावर जे यश व प्रतिष्ठा मिळवून दिली, ते निश्चितच लाखमोलाचे आहे.
-पंतप्रधान नरेंद्र मोदी
पद्मश्री बलबीर सिंग सिनियर यांच्या निधनाने अपरिमित हानी झाली आहे. महान हॉकीपटू असलेल्या बलबीर यांनी आपल्या स्टिकसह जागतिक हॉकीवर जी छाप उमटवली, ती निश्चितच स्पृहणीय आहे.
-गृहमंत्री अमित शाह
बलबीर सिंग हे अतिशय मितभाषी होते. हॉकी खेळणे आणि हॉकी शिकवणे यातच ते खूप रमायचे. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळेच आम्ही 1975 चा विश्वचषक जिंकू शकलो.
-तत्कालीन हॉकी कर्णधार अजित पाल सिंग
बलबीर सिंग यांच्यासारखा रोल मॉडेल लाभणे हे खूपच दुर्मीळ आहे. त्यांची ओळख झाली, हा मी माझा सन्मान मानतो. यापुढेही त्यांचे योगदान अवघ्या क्रीडा वर्तुळासाठी प्रेरणादायी असेल.
-ऑलिम्पिक सुवर्णजेता नेमबाज अभिनव बिंद्रा
एखाद्या महान खेळाडूने आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाने अवघे जग जिंकणे आणि त्यानंतरही त्या खेळाडूचे पाय जमिनीवर असणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे बलबीर सिंग सिनियर. त्यांचे अनुभवाचे बोल प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी ठरले.
-आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा
बलबीर सिंग सिनियर यांच्या निधनाने भारतीय क्रीडा वर्तुळाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्यासारखा महान खेळाडू लाभला, हे मी आपले सुदैव मानतो. त्यांचे योगदान निश्चितच लक्षवेधी आहे.
-क्रीडामंत्री किरेन रिजिजू
ध्यानचंद हे सर्वोत्तम खेळाडू होते. त्यांचे स्टिकवर्क अफलातून होते. त्यानंतर बलबीर सिंग यांना त्यांच्या स्कोअरिंगच्या क्षमतेबद्दल ओळखले जाईल. सिंग यांचे प्रशिक्षणही लाख मोलाचे होते.
-ऑलिम्पिक हॉकी सुवर्णजेते गुरबक्ष सिंग
जेव्हा 1956 ऑलिम्पिक फायनलमध्ये बलबीर दुखापतग्रस्त असतानाही खेळले!
1956 ऑलिम्पिक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडले आणि त्यात भारताने बाजी मारली. त्या लढतीत बलबीर यांनी एकही गोल केला नव्हता. पण, बोटाला प्रॅक्चर असताना देखील मैदानावर उतरण्याचा निर्णय घेत त्यांनी आपल्या दुर्दम्य जिद्दीची प्रचिती दिली होती. फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांनी या आठवणीला उजाळा दिला. बलबीर सिंग त्या लढतीत बोटावर प्लॅस्टर चढवून आणि वेदनाशामक गोळय़ा घेऊन मैदानात उतरले होते.