सांगली / प्रतिनिधी
महापूर नियंत्रणासाठी कर्नाटकसोबत संवाद-समन्वयचा भाग म्हणून पुढील आठवड्यात जलसंपदा मंत्री स्तरावर आणि त्यानंतर बेळगाव अथवा कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री स्तरावर बैठक होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. यानिमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा प्रथमच भेटणार आहेत.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापूराच्या अभ्यास समितीच्या अहवालातील नदीपात्रातील अतिक्रमणे व बांधकामाबाबत शासनस्तरावर धोरण ठरेल असे सांगितले. मात्र त्यांनी तातडीने त्यावर कार्यवाही शक्य नाही, असे सांगत अहवालाच्या संपूर्ण अंमलबजावणीबाबत असह्यता व्यक्त केली.
गतवर्षीच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर यावेळी प्रशासकीय स्तरावर उपाययोजनांच्या हालचाली सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सात मंत्री, चार खासदार आणि चौदा आमदारांसह अधिकारी-लोकप्रतिनिधींची जंगी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीनंतर मंत्री पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली.