हुक्केरी मठाधीशांचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
महापुरुषांच्या, राष्ट्रपुरुषांच्या पुतळय़ांची विटंबना करण्याचे काम कोणीही करू नये, असे आवाहन हुक्केरी हिरेमठाचे श्री चंदशेखर शिवाचार्य स्वामीजींनी केले आहे. बेळगाव परिसरात गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या अप्रिय घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळय़ांची विटंबना करण्यात आली आहे. या घटना निषेधार्ह आहेत. देशासाठी समर्पित भावनेने आपले उभे आयुष्य वेचलेल्या महापुरुषांचे अपमान करू नयेत. उलट त्यांचा आदर्श आत्मसात करून जीवन जगण्याचे आवाहनही स्वामीजींनी केले आहे.
शनिवारी येथील सामाजिक समसरता मंचच्या पदाधिकाऱयांनी जिल्हाधिकाऱयांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी स्वामीजींनी वरील माहिती दिली. कायदा हातात घेऊन शांत बेळगावच्या शांततेला सुरुंग लावू नका. या दोन्ही महापुरुषांचा आदर करीत प्रत्येकाने शांततेने जीवन जगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांची प्रतिकृती सोबत घेऊन जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.