सत्ता येत असते आणि जात असते, पण कोणीच ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही, मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायद्याला तिलांजली दिली असून लोकशाही अडचणीत आली आहे. महापुरुषांना काही बोलणाऱ्या नेते आणि मंत्र्यांना लाल लज्जा शरम आहे की नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी केली. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन ग्राम सचिवालय इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि विविध विकास कामाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर अजित पवार हे बोलत होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल स्वराज रक्षक वक्तव्याचा पुन्हा उच्चार करत, अजित पवार पुढे म्हणाले, मी काही चुकीचं बोललो नाही, पण ज्यांनी महापुरुषांच्या अवमान केला त्या पासून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधाकांकडून टुकारपणा चालू आहे.
आताच्या सत्ताधाऱ्यांना महिलांची मत पाहिजे असतात, मात्र ते मंत्रिमंडळात एका ही महिलेला मंत्री केले नाही. मंत्रिमडळ विस्तार करत नाहीत. अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे, आम्ही सुरू केलेल्या कामाना स्थगिती दिली जात आहे, अशी टीका ही विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी केली.