प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधारेमुळे जिल्ह्यासह शहराला महापुराचा विळखा पडला. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले. महापूर ओसरत असताना चार दिवसांनंतर सोमवारी राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला. पण कोल्हापूर-सांगली मार्ग बंद राहिला आहे. पुराचे पाणी ओसरत असताना पुरग्रस्त भागात औषध फवारणीसह स्वच्छता मोहिमेला वेग आला आहे. जिल्ह्यातील 74 बंधारे अद्यापी पाण्याखाली असल्याने बचावकार्य सुरूच राहिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा रद्द झाला. दिवसभरात 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात चार दिवसांनंतर महापुराचे पाणी ओसरू लागले आहे. रविवारी सायंकाळी राधानगरी धरणाच्या 5 स्वयंचलित दरवाजातून सुरू असलेला विसर्ग सोमवारी दुपारी थांबला. पावसाने सलग दुसऱ्या दिवशी उघडीप दिली. त्यामुळे पूर ओसरताच पुरग्रस्त भागात औषध फवारणीसह स्वच्छता मोहिमेला सोमवारी वेग आला. पुर्व भागात अद्यापी महापुराचे पाणी असल्याने बचावकार्य सुरू राहिले. पण आंबेवाडी, चिखली येथे `एनडीआरएफ’च्यावतीने सुरू असलेले बचावकार्य सोमवारी सायंकाळी थांबवण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा हवामानामुळे रद्द झाला. जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली असल्याने काही मार्गावरील वाहतूक अद्यापी बंद आहे. दिवसभरात 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
राधानगरी धरणातून 2828 क्युसेक विसर्ग
राधानगरी धरणात 233.40 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून सुरू असलेला विसर्ग थांबला आहे. दुपारी धरणाच्या वीजगृहातून 1400, सिंचन विमोचकातून 1428 असा 2828 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात 74 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील-शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी-राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदी- बीड व आरे, कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण व वालोली. कुंभी नदी- शेनवडे, कळे, वेतवडे व मांडूकली. धामणी नदी- पनोरे, सुळे, आंबर्डे, वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदी- वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड, सुळंबी, व कसबा वाळवे. वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली. हिरण्यकेशी नदी- ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी, हरळी. घटप्रभा नदी-कानडे सावर्डे, हिंडगाव, तारेवाडी, अडकूर, कानडेवाडी, ताम्रपर्णीवरील कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, माणगाव, असे 74 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणसाठा
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (द.ल.घ.मी.) असा ः तुळशी-94.47 दलघमी, वारणा-886.24, दूधगंगा-590.77, कासारी-63.51, कडवी- 71.24, कुंभी-68.60, पाटगाव-94.93, चिकोत्रा-40.09 दलघमी, चित्री- 53.41, जंगमहट्टी-32.40, घटप्रभा-44.17, जांबरे-23.23, आंबेआहोळ- 30.98.
प्रमुख बंधाऱ्यांची पाणीपातळी
प्रमुख बंधाऱ्यांची पाणीपातळी फुटांमध्ये अशी ः राजाराम 48, सुर्वे 45.3, रुई 77.2, इचलकरंजी 76, तेरवाड 74.1, शिरोळ 74.11 तर नृसिंहवाडीची 74.11 फूट इतकी पाणी पातळी आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सोमवारी झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः
हातकणंगले- 6.5
शिरोळ- 5.4
पन्हाळा- 16.1
शाहूवाडी- 22.1
राधानगरी- 55.6
गगनबावडा- 132.0
करवीर- 14.7
कागल- 18.2
गडहिंग्लज- 15.2
भुदरगड- 28.9
आजरा- 21.6
चंदगड- 30.2
जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांगांसाठी सानुग्रह अनुदान
अतिवृष्टीमुळे दिव्यांगांच्या समस्या कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगांना प्रती दिव्यांग 500 रूपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानासाठी 1 कोटी 21 लाख 21 हजार 600 रूपयांइतके अनुदान पंचायत समितींना वर्ग केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
तीन दिवसानंतर महामार्ग सुरु
सुरेश पाटील / पुलाची शिरोली
पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथे महापुराचे पाणी आल्याने महामार्ग बंद होता. महापुराचे पाणी ओसरल्याने तीन दिवसानंतर महामार्ग वाहतुकीसाठी सुरु झाला. सोमवारी सकाळी 7 वाजता या मार्गावर प्रशासनाकडून प्रात्यक्षिक घेण्यात आले. यानंतर सकाळी 10 वाजता प्रथम अवजड वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली. त्यानंतर अत्यावश्यक वाहने कोल्हापूरच्या दिशेने सोडण्यात आली.
दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने महापुराचे पाणी संथपणे ओसरु लागले. यामुळे सर्वांनाच महामार्ग सुरु होण्याची प्रतीक्षा होती. अखेर सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून या मार्गावर पोकलँड व जेसीबीच्या सहाय्याने प्रथम प्रात्यक्षिक घेऊन रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली.
कोल्हापूर शहराला पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असल्यामुळे महानगरपालिकेचे पाण्याचे टंकर प्रथम पाठविण्यात आले. यानंतर पेट्रोल, डिझेलचे टंकर, गॅस सिलेंडरचे ट्रक व गोकुळचे टँकर पाठविण्यात आले. त्यानंतर अत्यावश्यक असलेले मालवाहतुकीची वाहने क्रमाने सोडण्यात आली. प्रवासी एसटी बस, खाजगी बसेस व कार सोडण्यात आल्या. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूरकडून येणारी सुमारे एक हजार वाहने मार्गस्थ करण्यात आली.
आमदार विनय कोरे हे कोल्हापूरला जाण्यासाठी सांगली फाटा येथे येऊन थांबले होते. अवजड वाहनांची वाहतूक सुरू होताच त्यांनी आपली कार त्यांच्या पाठोपाठ थांबवली.
दरम्यान शुक्रवारपासून महामार्ग बंद असल्याने शेकडो वाहने रस्त्यावर थांबून होती. या वाहनधारकांना जेवण पाण्याची व्यवस्था सामाजिक संस्थांकडून करण्यात आली होती. यामध्ये माजी आमदार अमल महाडिक व व्यापारी लोकांच्यावतीने उमाभवन येथे. मुस्लिम समाजावतीने मदरसामध्ये अनेकांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. तर नागांव येथील आंबेडकर नगरमधील सिद्धार्थ समूहाच्यावतीनेही जेवण वाटप करण्यात आले..
पुलाची शिरोली व हालोंडी या हातकणंगले तालुक्यातील तर शिये या करवीर तालुक्यातील रहिवासी वस्तीतील पाणी ओसरल्याने घरातील साफसफाई करण्यात नागरीकांनी सोमवारी सुरुवात केली आहे.
1) प्रस्तावित सहा पदरी रस्ता भरावा टाकून न करता पिल्लर उभे करून रस्त्याची बांधणी केली जाणार आहे. तसा नकाशा मंजूर झाला आहे. यामुळे महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या गावात पुराचे पाणी जाणार नाही. अशी दक्षता घेतली जाणार आहे.
– व्ही. डी. पंदारकर
भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्रकल्प संचालक.
2) पुणे-बंगलूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी सिमेंटचे डिव्हायडर बसविण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी शिरोलीतील काही व्यक्तींनी जेसीबीच्या सहाय्याने ते काढून टाकले होते. कारण त्यामुळे पाणी मोठÎा प्रमाणात वाहून शिरोली गावात पुराचे पाणी शिरणार नाही, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.