आधी निधी आणावा; मगच वर्षपूर्तीची टिमकी वाजवावी
प्रतिनिधी / सांगाली
नेत्यांना खुश करण्यासाठी व मी काय तर करतोय हे दाखविण्यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची धडपड सुरू आहे. वर्षभरात शासनाकडून एक रुपयांचा ही निधी न आणू शकलेल्या महापौरांनी भाजप सतेच्या काळात मार्गी लागलेली कामे त्यांच्या नावावर खपविण्याचा उद्योग सुरू केला आहे. आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचाच हा प्रकार आहे. महापौरांनी स्वतःच्या हिंमतीवर शासनाकडून निधी आणावा, मगच वर्षपूर्तीची टिकमी वाजवावी, अशी घणाघाती टीका भाजप गटनेते विनायक सिंहासने व माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली.
सिंहासने म्हणाले, सूर्यवंशी यांच्या महापौर पदाला एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात कोट्यवधी रुपयांची कामे केल्याची टिमकी वाजवत ते फिरत आहेत. वास्तविक भाजपच्या अडीच वर्षाच्या काळात मार्गी लागलेल्या कामांचे श्रेय ते घेत आहेत. भाजपची सत्ता असताना तत्कालीन महापौर गीताताई सुतार यांनी मध्यवर्ती निदान केंद्र सुरू करण्याबत ठराव केला आहे. जीवनज्योत कॅन्सर रिलीफ अँड केयर ट्रस्टला जागा देण्याचा ठराव, सोनोग्राफी मशीन, आमराई, काळीखाण, प्रतापसिंह उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण दुरुस्ती, सांगली व मिरज शहरातील ट्रीमिक्स रस्ता, चिल्डरन पार्क, ऑक्सिजन प्लांट ही सर्व कामे भाजप सत्तेच्या काळातच मार्गी लागली आहेत.
असे असताना महापौर मात्र ही कामे मीच मार्गी लावली असा डंका पिटत आहेत, असे सांगत सिंहासने म्हणाले, महापालिकेची विजयनगर येथील नियोजित इमारत ही भाजपच्या काळातच मंजूर झाली आहे. त्याचे श्रेय महापौरांनी घेऊ नये. महापालिका क्षेत्रात ४ कोटींच्या निधीमधून रस्त्यांचे डांबरीकरण महापौरांनी त्यांच्याच प्रभागात केले आहे. सांगताना मात्र पूर्ण मनपा क्षेत्रात केल्याचा अविर्भाव ते दाखवत आहेत. त्यांच्याकडून नागरिकांची दिशाभूल करण्याचा उद्योग सुरू आहे. नेत्यांना खुश करण्यासाठी ही सगळी उठाठेव आहे. आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यापेक्षा महापौरांनी स्वतः शासनाकडून निधी मंजूर करून आणावा. त्यातून कामे करावीत, मगच वर्षपूर्तीची टिमकी वाजवत फिरावे, असा टोलाही सिंहासने यांनी यावेळी बोलताना लगावला.