नगरसेवकांची मागणी : प्रादेशिक आयुक्तांना निवेदन सादर, सर्वसामान्य नागरिकांचे हाल
प्रतिनिधी /बेळगाव
लोकशाही मार्गाने महापालिकेची निवडणूक घेऊन नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. मात्र 8 महिन्यांपासून महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात आली नसल्याने नगरसेवकांना अधिकार प्राप्त झाले नाहीत. केवळ नावाचे नगरसेवक असून, कामाचे नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने महापौर-उपमहापौर निवड करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवकांच्यावतीने प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आले.
सर्वसामान्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांची नियुक्ती केली जाते. गेल्या 8 महिन्यांपूर्वी निवडणूक घेण्यात आली होती. मात्र अद्यापही नगरसेवकांना अधिकार देण्यात आले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यास कठीण जात आहे. महापालिकेवर लोकनियुक्त सभागृह नसल्याने नागरिकांच्या समस्या कोणाकडे मांडायच्या, अधिकाऱयांकडे तक्रार केली असता समस्यांचे निवारण केले जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. शहरातील रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्डय़ांचे निवारण, पाणी समस्या, पथदीप दुरुस्ती आणि स्वच्छतेच्या समस्यांबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. या समस्यांचे निवारण करण्यासाठी सभागृहाची आवश्यकता आहे. अधिकार नसल्याने नागरिकांच्या मागण्या आणि समस्यांचे निवारण करण्यास अडचणी येत आहेत.
लोकनियुक्त सभागृहाच्या स्थापनेसाठी मागीलवषी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. पण आठ महिन्यांपासून महापौर, उपमहापौर निवड केली नसल्याने नगरसेवकांना अधिकार देण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निवारण कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसते. केवळ तक्रारींचे निवारण करावे, ही एकच मागणी असते. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर न केल्यास सर्वसामान्यांकडून नगरसेवकांचा अपमान केला जात आहे. केवळ नावाचे नगरसेवक असून, कामाचे नाहीत अशी टीका होत आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणूक घेऊन नगरसेवकांना अधिकार द्यावेत, अशी मागणी प्रादेशिक आयुक्तांकडे करण्यात आली.
प्रादेशिक आयुक्त अनुपस्थित असल्याने साहाय्यक प्रादेशिक आयुक्त नजमा पिरजादे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन वरि÷ अधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे साहाय्यक प्रादेशिक आयुक्तांनी सांगितले. निवेदन देण्यासाठी सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र 58 पैकी 15 नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, बसवराज मोदगेकर, पूजा पाटील, वैशाली भातकांडे, रेश्मा भैरकादार, शामोबीन पठाण, लक्ष्मी लोकरी, खुर्शिद मुल्ला, झेड ए. फतेखान, बाबाजान मतवाले, महंमद सोहेल संगोळी, अजिम पटवेगार आदी उपस्थित होते.