प्रतिनिधी / महाबळेश्वर :
पर्यटनासाठी महाबळेश्वरला आलेल्या ओंबळे कुटूंबियांना वेण्णालेक येथे घोडे व्यवसायिकांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची दुर्दैवी घटना येथे घडली होती. याप्रकरणी ओंबळे कुटूंबातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलिसांनी दोन घोडेवाल्यांना अटक केली आहे.
मुंबईतील 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जावली तालुक्यातील केडंबे गावातील तुकाराम ओंबळे यांच्या कुटूंबातील काही सदस्य हे 7 आक्टोबर रोजी महाबळेश्वरच्या सहलीवर आले होते. यामध्ये एकनाथ ओंबळे हे शिवसेनेचे पदाधिकारी देखिल होते. यांनी वेण्णालेक येथे सायंकाळी नौकाविहार केला. त्यानंतर त्यांनी वेण्णाधरणाच्या मोकळया जागेत घोडेसवारीचा आनंद लुटला. तेथुन परत येत असताना एका घोडेवाल्याने ओंबळे यांच्या कुटूंबातील एका महीलेला मागुन धक्का दिला. यावरून घोडेवाले व ओंबळे कुटुंबियांत वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. स्थानिक घोडेवाल्यांनी एकनाथ ओंबळे यांच्या बरोबर असलेल्या रामचंद्र ओंबळे, सुरज ओंबळे, प्रथमेश ओंबळे व आबेश ओंबळे यांना लाथाबुक्क्यांनी व हातातील चाबकाने मारहाण केली. याप्रकरणी ओंबळे यांच्या कुटूंबातील स्वाती रामचंद्र ओंबळे व (32 रा.केडंबे ता जावली) यांनी 7 आक्टोंबर रोजी रात्री महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
महाबळेश्वर पोलिसांनी तातडीने मारहाण करणारे जावेद खारकंडे व जुबेर वारूणकार या दोन घोडेवाल्यांना अटक केली. दोघांवर भारतीय दंड विधान कलम 354 , 143, 147, 149, 504, 506, 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.