अनेक विकासकामांचा शुभारंभ : आसाम-मेघालयमधील अंतर 203 किमीने झाले कमी
कोलकाता / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आसाममध्ये अनेक विकासकामांचा शुभारंभ केला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आसाममध्ये 3 हजार 231 कोटी रुपये खर्च आलेल्या महाबाहु-ब्रम्हपुत्रा योजनेचे लोकार्पण केले. याचबरोबर पंतप्रधानांनी धुबरी, आसाम आणि फुलबारी, मेघालय पुलाच्या कामाचा शुभारंभही केला व माजुली पुलाच्या उभारणीसाठी भूमिपूजन केले. याशिवाय अनेक योजनांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
माजुली-जोरहाट दरम्यान होणाऱया या पुलाच्या माध्यमातून आसाम आणि मेघालयाचा पश्चिम बंगालशी थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे. या पुलासाठी 900 कोटी रुपये इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे. ब्रम्हपुत्रा नदीवर धुबरी, आसाम आणि फुलबारी, मेघालय या पुलाची दहा वर्षांपासून मागणी होती. आता या पुलामुळे धुबरी आणि फुलबारी हे अंतर 203 किलोमीटरने कमी होणार आहे. अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. आसाम आणि मेघालय हे रस्तेमार्गाने अंतर 250 किलोमीटर आहे, मात्र पुलाच्या उभारणीमुळे भविष्यात ते केवळ 19 ते 20 किमी असणार आहे. आंतराष्ट्रीय वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमधील सेरामपूर ते आसामच्या धुबरी या 55 किमी लांबीच्या रस्त्याचे काम या ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. यामुळे भूतान, बांगलादेशला जाण्यासाठी लागणाऱया अंतर आणि वेळेची बचत होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.