प्रतिनिधी / काणकोण
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीचा सर्वाधिक फटका काणकोण तालुक्यातील मोटार सायकल पायलट आणि रिक्षा चालकांना बसला आहे आणि ही आर्थिक घडी सुधारण्यासाठी या व्यवसायावर आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणाऱया मोटार सायकल पायलटांनी सरकारने आपल्याला आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
या तालुक्यातील पैंगीण, चावडी, चार रस्ता, तारीर, आगोंदा, पाळोळे या ठिकाणी मोटारसायकल पायलट आणि रिक्षा चालक भाडे मारून आपला व्यवसाय कित्येक वर्षांपासून करीत आलेले आहेत. यातील जवळ-जवळ 36 मोटार सायकल पायलटांना लोकमान्य पतसंस्थेमार्फत सुरक्षेसाठी हेल्मेट वितरित केलेली आहेत. मागच्या वर्षीपासून आलेल्या कोरोना संकटामुळे या तालुक्यात पर्यटकांनी पाठ फिरविली.
त्यातच यंदा सुरुवातीचे लॉकडाऊन आणि सध्या चालू असलेली संचारबंदी यामुळे नागरिकांनी बाजारात येणेच बंद केलेले आहे. त्याचा जबदरस्त फटका या रिक्षा चालक आणि पायलटांना बसला आहे. केवळ या व्यवसायावर आपला चरितार्थ चालविणारे बँकेचे हप्ते, विम्याचे हप्ते कसे भरावेत, या चिंतेत पडले आहेत. चावडीवरील नेहमीच मोटार सायकल आणि रिक्षांनी गजबजणारा स्टॅण्ड सध्या पोलिसांची छावणी बनली आहे.
या संबधी चावडीवरील मोटारसायकल पायलटांनी काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा सांगितली, असल्याची माहिती मोटारसायकल पायलट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कोमरपंत यांनी दिली.