सुमारे 300 कर्मचाऱयांचा मडगावात गौरव
प्रतिनिधी /मडगाव
कोविड-19च्या महामारीच्या काळात गोव्यात डॉक्टर, नर्सेस तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱयांनी योगदान दिले तसेच अंगणवाडी शिक्षक व मुख्य सेविकांनी उल्लेखनिय कार्य केले. महामारीचा काळ असताना देखील अंगणवाडी शिक्षक व मुख्य सेविकांनी सरकारच्या योजनाचा लाभ जनतेला मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्या गौरवास पात्र असल्याचे उद्गार आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काढले.
मडगाव रवींद्र भवनात आयोजित केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱयांच्या गौरव सोहळय़ात आरोग्यामंत्री विश्वजीत राणे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच बाल व महिला कल्याण संचालिका दिपाली नाईक, उपसंचालिका ज्योती देसाई इत्यादीची उपस्थिती होती.
आरोग्यमंत्री श्री. राणे पुढे बोलताना म्हणाले की, महामारीच्या काळात अंगणवाडी शिक्षक, मुख्य सेविका यांनी लोकांच्या घरोनघरी भेट देऊन केंद्र सरकारने राबविलेल्या रेशन योजनेचे घरोनघरी वितरण केले. महामारीच्या पहिल्या व दुसऱया लाटेच्यावेळी हे काम करताना त्यांनी जोखीम पत्करली होती. स्तनपान करणाऱया व गरोदर महिलांना न्यूट्रिशनचे वितरण केले. त्यामुळे नवजात बालकाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत झाली.
पब्लिक हेल्थ फांऊडेशन ऑफ इंडिया यांच्याकडे सरकारने करार केल्ना असून या फांऊडेशनचे प्रमुख श्रीनाथ रेड्डी यांनी एक योजना राबविली आहे. या योजनेद्वारे धोकादायक गर्भधारणेच्या प्रकरणाची वेळीच आरोग्य केंद्राना कल्पना देण्याचे काम सुद्धा अंगणवाडीच्या कर्मचाऱयांनी केले आहे. त्यांनी कोविडच्या काळात मार्गदर्शन तत्वाचा सुद्धा यथायोग्य वापर केला. त्यामुळे आपण त्यांचे आभार आहोत,
आरोग्यमंत्र्यांच्या आजीच्या नावाने पुरस्कार
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपली आजी श्रीमती मनोरमाबाई राणे हिच्या नावाने 50 लाख रूपयांचा निधी आरोग्य खात्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला असून या निधीच्या माध्यमांतून दरवर्षी 1 लाख रूपयांचा पुरस्कार उत्कृष्ट सीडीपीओ, 50 हजार मुख्य सेविका व 25 हजार उत्कृष्ट शिक्षक आणि 15 हजार मदतनीस यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. हे पुरस्कार यापुढे दरवर्षी दिले जातील अशी घोषणा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी केली.
तृतीय लाटेवर आम्हाला लक्ष ठेवावे लागेल
कोविंडची तृतीय लाट येणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. या तृतीय लाटेवर आम्हाला अधिक लक्ष द्यावे लागणार आहेत. सद्या गोव्यात शंभरच्या वर खाली असे रूग्ण दररोज आढळून येतात. अशावेळी सर्वांनी जागृत राहणे आवश्यक आहे. योग्यवेळी योग्य ती मार्गदर्शन तत्वे लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱया लाटेत अंगणवाडी कर्मचाऱयांनी झुंज दिली
कोविडच्या पहिल्या लाटेतून आम्ही बरेच काही शिकलो. त्यानंतर दुसरी लाट आली. ही लाट प्रचंड दहशत माजविणारी होती. त्यात अनेकांचे बळी गेले. तरी सुद्धा न डगमगता अंगणवाडीच्या कर्मचाऱयांनी, लोकांना मदतीचा हात दिला. त्यांनी दिलेली झुंज ही उल्लेखनिय होती. अंगणवाडीचे शिक्षक व मदतनीस यांना प्रचंड वेतन मिळत नाही. तरी सुद्धा त्यांनी आपली जबाबदारी ओळखून कार्य केल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यावेळी बोलताना म्हणाले.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे तरूण असून जनतेसाठी काम करण्याची त्यांना तळमळ आहे. ते अंगणवाडीच्या कर्मचाऱयांमागे खंबीरपणे उभे राहिल्याचे हे या कार्यक्रमांतून स्पष्ट होत आहे अशा शब्दात श्री. कामत यांनी आरोग्यमंत्र्याबद्दल गौरवोद्गार काढले. अंगणवाडीच्या शिक्षिका तसेच इतर कर्मचाऱयांच्या योगदानाकडे नेहमीच दुर्लक्ष व्हायचे. मात्र, त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा हा पहिलाच प्रसंग असून अंगणवाडी कर्मचाऱयांचे योगदान यामुळे अधोरेखित झाल्याचे श्री. कामत म्हणाले.