कोरोनाच्या महामारीत हातावर पोट असलेल्यांना ‘ना घर ना वाट’ अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अनेक कामगार उपाशी पोटी शेकडो मैल चालत आपल्या गावाची वाट धरण्याचा प्रयत्न करताना अनेक लोकांचे भूक बळीही गेले आहेत. अशा कसोटीच्यावेळी कवी-लेखक-कलावंत आपली कोणती भूमिका बजावताहेत हेही महत्वाचे ठरते.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने जगभर हाहाकार माजवला आहे. प्रत्येक माणूस भीतीच्या छायेखाली जगतो आहे. भारतातही या रोगाचा मोठय़ा प्रमाणात फैलाव सुरू झाला आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सगळीकडे लॉक डाऊन करण्यात आले. यामुळे निराधारांवर, मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा महामारीत लेखक-कलावंतांनी कोणती भूमिका घ्यावी, असा प्रश्न तर उपस्थित होतोच. त्यांनी समाजाचे जेवढे शक्य आहे, तेवढे प्रबोधन करावे किंवा ज्यांना शक्य आहे, त्यांनी निराधारांना आधार देण्याचाही प्रयत्न करावा. या पार्श्वभूमीवर मराठी कवी, लेखक, कलावंतांनी अल्प प्रमाणात का असेना पण पुढाकार घेतलेला दिसतो आहे ही दिलासा देणारी घटना आहे.
कवी प्रकाश घोटगे यांची एक जुनी गाजलेली कविता आहे. “नाही घराचा भरोसा, नाही विश्वाचे दार, झुळुकेच्या वेषामध्ये वारा झाला आहे चोर. आता आपल्या श्वासाची तरी कुणी द्यावी हमी, साऱया विषारी वायूने आता सावरली भूमी!’’ आज याचीच तर सर्वत्र प्रचिती येत आहे. सर्व भवतालात कोरोनाचे विष पेरले गेले असल्याचा क्षणाक्षणाला भास होत आहे. भयग्रस्तता वातावरणात दाटून राहिली आहे. आपल्या समारे पुढे काय वाढून ठेवले आहे, याचीही कल्पना आपल्याला येत नाहीय. विज्ञानाच्या आधारावर आपण प्रगती केली आणि ज्ञानी झालो. ज्ञानाचा एवढा पाझर सगळीकडे फुटला की मृत्यूवरही विजय मिळविल्याची भावना अनेकांमध्ये निर्माण झाली. कोरोनाने मात्र मृत्यूचेच थैमान घातले आणि माणूस हा क्षुद्रच असल्याचे जगासमोर आणले. पण भूकेच्या आगीचे आपण काय करणार आहोत? हा प्रश्न उरतोच. कोरोनाने जग जागच्या जागेवर थांबले आहे. जगच लॉक डाऊन झाले आहे. त्यामुळे नागरीवस्ती बरोबर प्राणीमात्रांचाही जीव भूकेने तडफडतो आहे. याला उपाय शेवटी माणसाची संवेदनशीलताच. ती जेव्हा-जेव्हा जागृत होते, तेव्हा-तेव्हा बेघर माणूस आपला जीव जगवीत असतो. कोरोनाच्या या काळात मुळातच विस्थापित असलेला माणूस अधिकच विस्थापित झाला आहे. हातावर पोट असलेल्यांना ‘ना घर ना वाट’ अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक कामगार उपाशीपोटी शेकडो मैल चालून आपल्या गावची वाट धरण्याचा प्रयत्न करताना अनेक लोकांचे भूकबळीही गेले आहेत. तर जे घरात सुरक्षित आहेत, त्यातील अनेकजण भयाने ग्रासले आहेत. अशा कसोटीच्यावेळी कवी-लेखक-कलावंत आपली कोणती भूमिका बजावताहेत हेही महत्वाचेच ठरते. यात भूकेलेल्यांना मदत जशी आजच्या परिस्थितीची गरज ठरते, त्याचप्रमाणे प्रबोधन ही सुद्धा आजची खरी गरज आहे. आजच्या परिस्थितीत नाटक-सिनेमा-अशा मनोरंजनाच्या क्षेत्रात बॅक स्टेजला काम करणाऱया वर्गाचाही पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण यातील काहींना आधार देणारा एक कलावंत वर्ग पुढे आला आहे. पुण्यातील काही प्रयोगशील नाटकवाले आणि काही संस्था एकत्र आल्या. त्यांनी रंगभूमीवर काम करणाऱया बॅकस्टेज आर्टिस्टंना पदरच्या निधीचा मदतीचा हात दिला आहे. यात अजित दळवी, चं. प्र. देशपांडे, आशुतोष पोतदार, धर्मकीर्ती सुमंत, किरण यज्ञोपवीत, सिद्धेश पुरकर, ज्योती सुभाष, अश्विनी गिरी, गौरी लागू, विभावरी देशपांडे, रुपाली भावे, श्याम जोशी, डॉ. दीपक मांडे, आशिष मेहता, ओंकार गोवर्धन, सागर देशमुख, अमेय वाघ, धीरेश जोशी, श्रीकांत भिडे, क्षितीज दाते, पर्ण पेठे, ऋचा आपटे, अभय जबडे, कृतार्थ शेवगावकर, रणजीत मोहिते, उज्ज्वला ढमढेरे, रेखा ठाकुर, आशिष वझे, धनंजय सरदेशपांडे, अजित साबळे, अंशुमन जोशी, अतुल पेठे, मोहित टाकळकर, प्रदीप वैद्य, डॉ. प्रवीण भोळे, आलोक राजवाडे, निपुण धर्माधिकारी, निरंजन पेडणेकर, प्रमोद काळे, सुरज पारसनीस, आदित्य पवार, ऋषी मनोहर, सुयोग देशपांडे, श्याम भूतकर, साकेत कानेटकर, योगेश आंबेकर, कुमार गोखले, आशिष देशपांडे या कलावंतांबरोबरच आसक्त, नाटक कंपनी, आजकल, थिएट्रॉन आणि नाटकघर, पुणे या नाटय़ संस्थांचाही समावेश आहे. या संदर्भात बोलताना कृतीशील रंगकर्मी अतुल पेठे म्हणतात, सध्या जगाच्या रंगभूमीवर ‘कोरोना थैमान नाटय़’ सुरू आहे. हे नाटय़ इतके विद्रूप आहे, की इथे आज न वाजणाऱया तीन घंटा या सर्जन निर्मितीच्या नसून जणू सर्जन स्थगितीच्या आहेत. त्या भयप्रद शांततेने प्रत्येकाचे मन काळवंडले गेले आहे. अर्थात हे असले अनेक विषाणूचे खेळ जागतिक रंगभूमीने पाहिले आहेत आणि त्यावर पडदा टाकून पुढच्या नवनिर्मितीची घंटाही तिनेच वाजवली आहे. या प्रगाढ आत्मविश्वासाने सध्याच्या विपरित दृश्यात एक छोटा हातभार लावायचा म्हणून आपण, रंगभूमीवरील काम करणारे ‘बॅकस्टेज आर्टिस्ट’ यांना सध्याच्या त्यांच्या होत असलेल्या आर्थिक अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे. ही मदत अल्प आहे, याची आम्हाला नम्र जाणीव आहे. कवी अनिल साबळे हे नेहमीच कुणाकुणाकडून मदत घेऊन जुन्नर भागातील आदिवासींच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न सोडवित असतात. आता कोरोना व्हायरसमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या लोकांसाठी या आधीही ज्येष्ठ कवी मंगेश नारायणराव काळे यांनी अनिल यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द केली होतीच. परंतु कोरोनाच्या या महामारीत पोटापाण्यासाठी महाग झालेल्या या आदिवासींसाठीही काळे यांनी आर्थिक मदत पाठविली आहे. तर वैभववाडी येथील दिव्यांग कवी सफरअली इसफ आणि त्यांच्या 12 मित्रांनी सोलापूरच्या ग्र्रामीण भागातील बेघर 35 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करून कोरोनाच्या या भयग्रस्त वातावरणात निराधारांना आधार देण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. या संदर्भात सफर म्हणतात, आधी माणूस म्हणून आपण समाजात वावरत असतो. जेव्हा एखादे वैश्विक संकट समाजात येते. तेव्हा जात, पात, धर्म विसरून माणसाने माणसासाठी झटले पाहिजे. स्वतःकडे जर एक भाकर असेल आणि शेजारी उपाशी असेल, तर त्यातील अर्धी भाकर शेजाऱयास देऊन त्याची भूक थोडी तरी शमवली पाहिजे. तरच भूकबळीने मरणाऱयांची संख्या कमी होईल. भूकेला धर्म नसतो. त्याला कुठलाही रंग नसतो. भूकेला फक्त पोटातील आगडोंब सहन करावा लागतो. कवी म्हणून संकटसमयी मदतीचा हात देणे ही आपली जबाबदारी असते. अर्थात आडखेडय़ात राहून लेखन करणाऱया सफर यांच्या सारख्याच्या हे लक्षात येते, तसे नावलौकिकता प्राप्त केलेल्या सर्वच कवींना अशी जाणीव होईल, तेव्हाच लिहिलेली कविताही प्रत्यक्ष कवी जगले, असेच म्हणता येईल!
अजय कांडर