वार्ताहर / राजापूर
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी राजापुरातील कोंढेतड गाडगीळवाडी येथील वहाळातील खोदाईमुळे दुषित पाणी लगतच्या विहिरीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याबाबत ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन व्यथा मांडली आहे.
सध्या मुंबई-गोवा महामार्गावर कोंढेतड गाडगीळवाडी येथील रखडलेल्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी वहाळात खोदकाम केल्यामुळे तेथील दगड-माती, सिमेंट लगतच्या विहिरीत जाऊन विहिरीचे पाणी गढूळ व दूषित होत आहे. तसेच विहिरीच्या बांधकामालाही धोका निर्माण झाला आहे. यासाठी वहाळावर संरक्षक भिंत त्वरित बांधून मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना सुभाष नवाळे, जितेंद्र तुळसावडेकर, संतोष कोतरे, अनंत नवाळे, अनिश वाघाटे, रूपेश कोतरे आदी उपस्थित होते.