एकजण गंभीर जखमी, वाढे फाटय़ानजिक दुर्घटना, वाहनचालक पसार
प्रतिनिधी /सातारा
सातारा तालुका हद्दीत पुणे-बेंगलोर महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक एवढी भिषण होती की, दुचाकीस्वार तेजस राजेंद्र गायकवाड-पालवे (वय 19, रा. मोरघर ता. जावली) याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले संतोष विश्वनाथ गायकवाड (वय 40, रा. मोरघर ता. जावली) हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोरघर (ता. जावली) येथे राहत असलेला तेजस राजेंद्र गायकवाड (पालवे) व संतोष विश्वनाथ गायकवाड (पालवे) हे सातारा एमआयडीसीमधील मुथा फांऊडरी कंपनीत कामास आहेत. दि. 6 रोजी तेजस व संतोष हे दोघे सकाळी मोटार सायकल (क्रं. एमएच 11 डीई 3742) वरून कामावर यायला निघाले. कामावर येत असताना वाढे (ता. सातारा) गावच्या हद्दीत वाई ऍग्रो शोरूमजवळ आल्यावर सकाळी 7 च्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीसह दोघेही रस्त्यावर पडले. दुचाकी चालवत असलेल्या तेजसच्या डोक्यावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष हे गंभीर जखमी झाले. दुचाकीचे ही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमी संतोष गायकवाड यांना तत्काळ उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातस्थळी मोठय़ा प्रमाणावर बघ्याची गर्दी झाली होती. या अपघाताची माहिती तेजसचा चुलत भाऊ तुषार शंकर गायकवाड (वय 27, रा. मोरघर ता. जावली) याला मिळताच तो अपघातस्थळी आला. त्याने अज्ञात वाहनाविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू
वाढे फाटय़ानजिक महामार्गावर दुचाकीला ठोकरल्याने अपघातग्रस्त वाहनचालकाने ते वाहन तसेच पुढे नेहले. सकाळी महामार्गा वाहनाची संख्या कमी असते, त्याचाच फायदा त्या वाहनचालकाने घेतला आहे. परंतु सदरचे वाहन कोणते याचे शोधकार्य सुरू आहे. यासाठी महामार्गावर असणाऱया हॉटेल किंवा व्यावसायिकांकडून कोणती माहिती अगर सीसीटीव्ही फुटेज मिळतेय का हे पोलीस तपासात आहेत.
सकाळच्या वेळी होणाऱया अपघात वाढ
अनलॉकमुळे काही दिवसापूर्वी निर्बंध शिथील झाल्याने मॉनिंग वॉकला जाणाऱयाच्या संख्येत वाढ झाली होती. परंतु या वाढत्या संख्येबरोबर अपघाताची ही संख्या वाढली. सैदापूर येथे मुख्याध्यापक यांना भरधाव वेगाने येणाऱया चारचाकी गाडीने उडवले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शहरातील विविध भागात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तसेच मार्गालगत फिरायला जाणाऱया पादचाऱयांना भरधाव वेगाने येणाऱया गाडय़ांचा रोजच अनुभव येत असतो. महामार्गावर वाहनांची मर्यादा ठरलेली आहे. तरीही वेग मर्यादेच्या नियमांचे पालन वाहनधारकांकडून होत नाही. यावर पोलीसांकडून कोणती पावले उचलण्यात येत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.