प्रतिनिधी/ खेड
महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या रामचंद्र लक्ष्मण कदम (62 रा. बोरिवली) यांचा उपचारापूर्वीच वाटेतच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास महामार्गावरील आपेडे फाटय़ानजीकच्या हॅप्पी पंजाबी ढाब्यासमोर घडली. महामार्गावर पडलेल्या दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला.
मुंबई-बोरिवली येथे राहणारे रामचंद्र कदम हे कुटुंबासह एम.एच. 47 बी/बी 1577 क्रमांकाच्या हुंडाई क्रेटा कारने मालवण येथे आले होते. याठिकाणी काम उरकल्यानंतर रविवारी रात्री कारने पुन्हा मालवण येथून मुंबईला जायला निघाले. विश्रांतीसाठी ते काहीकाळ महाड येथे थांबणार होते. आपेडे फाटय़ानजीक आले असता महामार्गावर पडलेल्या दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने उभ्या असलेल्या जी.जे. 25 टी/ 9407 या क्रमांकाच्या ट्रकला कारने पाठीमागून धडक दिली.
या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले. अपघाताची खबर मिळताच मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी व सहकाऱयांसह रूग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहचले. मदत ग्रुपच्या रूग्णवाहिकेने त्यांना उपचारार्थ कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या कदम यांना तासभर उपचारच मिळाले नाहीत. अखेर कुटुंबियांनी उपचारासाठी पनवेल किंवा मुंबई येथे हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पनवेल येथील रूग्णालयात घेवून जात असतानाच त्यांना मृत्यूने गाठले.
चौकट ः
महामार्गावर ट्रकसारखी अवजड वाहने पार्किंग करणाऱयांवर महामार्ग वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे असतानाही तशी कोणतेही कारवाई केली जात नाही. याचाच फायदा ट्रकचालक घेत असून महामार्गावर वाहने उभे करून जेवणासाठी हॅप्पी पंजाबी ढाब्यावर जात असतात. रस्त्याच्या कडेला उभे केले जाणारे ट्रक अन्य वाहनांना दिसत नसल्याने सातत्याने जीवघेणे अपघात घडत आहे. महामार्ग वाहतूक पोलिसांनी ही बाब गांभिर्याने घेवून महामार्गावर ट्रक उभे करणाऱया चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.