शिवसेनेसोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी होणार सहभागीः
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यात मागाहून मंजूर झालेला समृध्दी महामार्ग पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पण कोकणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा गेल्या 11 वर्षानंतरही बोऱया उडाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तो लवकर पूर्ण होईल, अशी असलेली अपेक्षा आता फोल ठरली आहे. ठेकेदार व अधिकारी यांना सूचना देऊनही ते ऐकत नाहीत. त्यामुळे येत्या 27 जानेवारी रोजी चिपळूणपाठोपाठ मुंबई-गोवा महामार्गावर शिवसेनेच्यावतीने लांजा ते चिपळूण-खेड या दरम्यान ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या महामार्ग चौपदरीकरणासाठी खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अनेकवेळा बैठका घेतल्या. महिनाभरापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत रेंगाळलेल्या कामासंदर्भात बैठकही पार पडली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी चौपदरीकरणाची रखडलेली कामे तातडीने सुरु करण्याचे आदेश दिले होते. मात्र आज महिना उलटूनही ठेकेदाराने याकडे लक्ष दिलेले नसल्याचे आमदार राजन साळवी, शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितले.
खितपत पडलेल्या महामार्ग चौपदरीकरण कामाकडे या विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आक्षेप पत्रकार परिषदेत घेण्यात आला. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी 10 वर्ष वाट पहायची काय, असा सवाल करण्यात आला. आता कोकणी माणसाच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. महामार्गाच्या नियुक्त इतर ठेकेदारांची कामे संथगतीने सुरू आहेतच, पण एमएपी या ठेकेदाराकडूनच का वेळकाढू धोरण घेतले जातेय, असाही सवाल करण्यात आला. वाकेड ते आरवली हे 2 टप्पे प्रामुख्याने रखडले आहेत. रस्त्याला खड्डे पडले असून पावसात फक्त खड्डे भरण्याची कामे ठेकेदारांकडून होत आहेत. वाहनचालकांचे हाल होत आहेत. त्यामुळे काम न करणाऱया या ठेकेदारांना शिवसेनास्टाईल धडा मिळावा, लोकांना होणारा त्रास कायमचा दूर व्हावा, यासाठी हे आंदोलन असल्याचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी स्पष्ट केले.
महिनाभरापूर्वी मिटींग होऊनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनाही ऐकल्या जात नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी म्हटले आहे. रस्ते विकासाचे चांगले काम करणाऱया गडकरी यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्ग उपेक्षित रहावा अशी अपेक्षा नव्हती, असे मत विलास चाळके यांनी व्यक्त केले. त्यासाठीच येत्या 27 जानेवारी रोजी मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम केला जाणार आहे. केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता लांजा, पाली, हातखंबा, आरवली, संगमेश्वर, चिपळूण येथे चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात शिवसेनेबरोबरच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही यात सहभागी होणार असल्याचे आमदार साळवी यांनी सांगितले. खेडमध्ये आमदार योगेश कदम, चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधव व आमदार शेखर निकम, हातखंबा व पाली येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व लांजात आपण स्वतः याचे नेतृत्व करणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केले.
बाजारपेठा बंद ठेवून व्यापारीही देणार पाठिंबा
या आंदोलनात महामार्गावरील बाजारपेठा बंद ठेवून व्यापारीही आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला महिला जिल्हाप्रमुख वेदा फडके, उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, जगदीश राजापकर, संजू साळवी, रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रदीप साळवी, लांजा तालुकाध्यक्ष संदीप दळवी, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांची देखील उपस्थित होती.