पर्यावरणवाद्यांनी स्थगिती आणल्याने सात महिन्यापासून काम बंद : महामार्ग प्राधिकरणाला नव्या कंत्राटदाराचा शोध घेण्याची वेळ?
प्रतिनिधी / खानापूर
बेळगाव-पणजी महामार्ग रुंदीकरणापैकी खानापूर-रामनगर-अनमोड रस्त्याच्या रुंदीकरण व विकासाची निविदा दिलीप बिल्डकॉन कंपनीने स्वीकारून त्याचे कामही सुरू केले होते. पण त्या कामाला पर्यावरणवाद्यांनी स्थगिती आणल्याने गेल्या सात महिन्यापासून काम बंद पडले आहे. तर सदरच्या कामात वेळोवेळी येणाऱया अडथळय़ांमुळे दिलीप बिल्डकॉन कंपनीने त्या रस्त्याच्या कामातून माघार घेतली असल्याचे वृत्त आहे. यामुळे आता सदरच्या कामासाठी महामार्ग प्राधिकरणाला नव्या कंत्राटदाराचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
बेळगाव-पणजी महामार्ग रुंदीकरणाचे दोन टप्पे करण्यात आले होते. त्यापैकी बेळगाव-खानापूर महामार्ग रुंदीकरण व विकासाचे काम अशोक बिल्डकॉन कंपनीला तर खानापूर-रामनगर-अनमोड रस्ता रुंदीकरण व विकासाचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनीने स्वीकारले होते. दोन्ही कंपन्यांकडून दोन वर्षापूर्वी रस्त्याच्या कामाची सुरवातही झाली. त्यामध्ये हलगा ते मच्छे व भुतनाथ डोंगरपासून अर्धा कि. मी. रस्ता वगळता इतर सर्व ठिकाणी अशोक बिल्डकॉन कंपनीचे युद्धपातळीवर काम सुरू असून कामाचा दर्जाही चांगला आहे. मात्र हलगा, मच्छे बायपास रस्त्याला शेतकऱयांनी स्थगिती आणली आहे. तर भुतनाथ डोंगरपासून अर्धा कि. मी. रस्त्याच्या बाजूला वनक्षेत्र असल्याने त्या ठिकाणी देखील कामाला स्थगिती आली आहे. मात्र इतर सर्व ठिकाणी रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून गणेबैल ते झाडशहापूरपर्यंतच्या रस्त्याचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर खानापूर शहराजवळील हत्तरगुंजी, हलकर्णी, खानापूर, करंबळ ते होनकलपर्यंतच्या बायपास रस्त्याचे कामही जोमाने सुरू आहे. यामुळे पुढील डिसेंबरपूर्वी दोन ठिकाणचा अपवाद वगळता बाकी सर्व काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा रस्ता चारपदरी केला जात आहे.
तर खानापूर, लोंढा, रामनगर ते अनमोड पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वनक्षेत्र असल्याने त्या ठिकाणी दुपदरी रुंदीकरण करण्यास मंजुरी मिळाली. त्यामध्ये येणाऱया झाडांची कत्तलही पूर्ण परवानगीनिशी झाल्यावरच दिलीप बिल्डकॉन कंपनीने देखील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते. मात्र त्यांच्या कामाच्या दर्जाबद्दल जनतेकडून तक्रारी ऐकिवात होत्या. त्या कंपनीने रामनगर ते अनमोड रस्त्याचे बरेचशे काम पूर्ण केले. मात्र खानापूर, लोंढा, रामनगर रस्त्याचे काम संथगतीनेच सुरू होते. तेवढय़ातच या संपूर्ण रस्त्याच्या कामाला पर्यावरणवाद्यांनी स्थगिती आणली. तसेच काम सुरू असतानाही वनखात्याकडून अनेकदा अडचणी निर्माण झाल्या. यामुळे दिलीप बिल्डकॉन कंपनी या कामात येणाऱया अडथळय़ामुळे बरीच नाराज होऊन त्यांच्या कामावरही परिणाम झाला. यामुळे स्थगिती आल्यानंतर काही दिवस वाट पाहून त्या कंपनीने आपल्या साऱया यंत्रणेला देशातील अन्य महामार्गाच्या कामाकडे वळविले. व या ठिकाणी मात्र खडीचा साठा व इतर साहित्याचे रक्षण करण्यासाठी ठराविक कामगार ठेवले होते. पण लवकर स्थगिती उठण्याची चिन्हे दिसत नसल्याने त्या कंपनीने आता सदर रस्त्याच्या कामातून पूर्णतः माघार घेतली असल्याचे वृत्त आहे. यामुळे आता महामार्ग प्राधिकरणाला या कामासाठी नवा कंत्राटदार शोधावा लागणार आहे. बेळगाव ते खानापूर रस्त्याचे काम अशोक बिल्डकॉन कंपनीकडून अत्यंत व्यवस्थितपणे सुरू असल्याने त्याच कंपनीला खानापूर, रामनगर, अनमोड अर्धवट झालेल्या कामाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी होत आहे.