कन्नड दुराभिमानी युवकांकडून दीपक दळवी यांच्यावर शाईफेक : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची आज बेळगाव बंद
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगावमध्ये अधिवेशन घेत आहे. या अधिवेशनाला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली महामेळावा घेतला जातो. महामेळावा घेण्याची परंपरा ही यावषीही कायम राहिली. मात्र कन्नड दुराभिमानी युवकांनी शाईफेक करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटत असून मंगळवार दि. 14 रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव बंदची हाक दिली आहे. शाईफेक करण्याचा प्रकार घडला असला तरी याकडे दुर्लक्ष करत मराठी भाषिकांनी महामेळावा पार पाडला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हॅक्सीन डेपो परिसरात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीने पोलिसांकडून महामेळाव्याची परवानगी मागितली होती. परंतु त्यांच्याकडून होकार अथवा नकार मिळाला नव्हता. सोमवारी महामेळावा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक सभास्थळी दाखल झाले. महानगरपालिकेकडून स्टेजला परवानगी नसल्याचे सांगत काढण्यास सुरूवात केली. यामुळे कार्यकर्ते व मनपा अधिकाऱयांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
हे एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे काही कन्नड दुराभिमानी युवकांनी दीपक दळवी यांच्यावर शाईफेक केली. या प्रकाराने एकच खळबळ माजली आणि संतापाची लाट उसळली. शाईफेक करणाऱयांना पोलिसांनी वाहनातून नेले. यानंतर गोंधळ सुरू होता. परंतु या गोंधळाच्या स्थितीतही महामेळाव्यात नेते तसेच कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली.
मराठी भाषिक न्याय हक्कांपासून वंचित
युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, मराठी माणसांवर दादागिरी करत त्यांना आपल्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. शांततेत महामेळावा होत असताना कन्नड दुराभिमानी युवकांनी केलेले कृत्य निंदनीय आहे. आता तरी राष्ट्रीय पक्षात गेलेल्या युवकांनी स्वाभिमानासाठी म. ए. समितीमध्ये परतावे, असे आवाहन त्यांनी केले.
…तर सडेतोड उत्तर दिले जाईल
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण गावडे म्हणाले, कर्नाटक सरकारला विरोध म्हणून मराठी भाषिक महामेळावा घेतात. दीपक दळवी यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकाराचा आम्ही निषेध करतो आणि असे प्रकार पुन्हा घडल्यास त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार
माजी उपमहापौर आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर म्हणाल्या, पोलिसांकडून कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱयांना पाठिशी घालून असे प्रकार करण्यात येत आहेत. याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे. यामुळे लोकशाहीला काळीमा फासणारी ही घटना असून याचा सर्वत्र निषेध झाला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रकार
माजी महापौर सरिता पाटील यांनी इशारा देत सीमावासियांच्या नादाला लागाल तर त्याचे परिणाम वाईट होतील. घटनेची पायमल्ली करत कर्नाटक सरकार मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रकार करत आहेत. परंतु यापूर्वीही असे प्रकार घडले असून मराठी भाषिकांनी सडेतोड उत्तर दिल्याचे त्या म्हणाल्या.
माजी जि.पं.सदस्या सरस्वती पाटील यांनी पोलिसांवर हल्लाबोल केला. पोलीस प्रशासन हे कानडी गुंडांच्या हातातील खेळणे बनले आहे. गुंड काहीही करतील त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी ही पोलिसांची झाली आहे. अशा पोलीस प्रशासनाला या कृत्याची लाज वाटली पाहिजे, असे त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, रवी साळुंखे, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, सुधा भातकांडे, नितीन खन्नुकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलीक, गोपाळ पाटील, निपाणी विभागाचे प्रमुख जयराम मिरजकर, शिवाजी सुंठकर यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महामेळाव्यात मांडण्यात आलेले ठराव
- बेळगाव हा कर्नाटकाचा भाग आहे हे दाखवून देण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगावमध्ये अधिवेशन घेते. याला विरोध म्हणून मराठी भाषिक महामेळाव्याचे आयोजन करतात. कर्नाटक सरकारच्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी हा महामेळावा आयोजित केला जातो. बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असून महाराष्ट्रात सामील झाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.
- शांततेच्या मार्गाने सुरू असणाऱया महामेळाव्यामध्ये अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाईफेक करण्यात आली. असे कृत्य करणाऱयांवर कडक कारवाई करावी.
- दुराभिमान्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून मंगळवार दि. 14 रोजी पुकारलेला बंद बेळगावकरांनी यशस्वी करायचा आहे.
- या हल्ल्याची महाराष्ट्र सरकारने दखल घेत कर्नाटक सरकारला समज द्यावी. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांनी मराठी बाणा दाखवत सीमावासियांच्या पाठिमागे ठामपणे उभे रहावे, असे ठराव टाळय़ांच्या गजरात महामेळाव्यात मांडून संमत करण्यात आले.
टी. के. पाटील यांच्याकडून शाईफेकीचा निषेध
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड दुराभिमान्यांनी शाईफेक केली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. मंगळवारी होणाऱया बंदमध्ये मराठी भाषिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष टी. के. पाटील यांनी केले आहे.
पोलिसांच्या डोळय़ादेखत शाईफेक
पोलिसांच्या संरक्षणातच दादागिरी, पोलिसांचे नियोजन ठरले अपयशी
बेळगाव ः दीपक दळवी यांच्यावर पोलिसांच्या डोळय़ादेखत काही कन्नड दुराभिमानी युवकांनी शाईफेक केली. ज्यावेळी शाईफेक केली त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पोलीस संरक्षणात कन्नड संघटनांची पुन्हा एकदा दादागिरी आणि कुटीलता दिसून आली. पोलिसांनी केलेले नियोजन हे पूर्णपणे अपयशी ठरले.
कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. याच पार्श्वभूमीवर याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळावा भरविण्यात आला होता. हा मेळावा अत्यंत शांततेत आणि संयमाने पार पाडण्यासाठीही महाराष्ट्र एकीकरण समिती प्रयत्नशील होती. मात्र अचानक पोलिसांच्या डोळय़ादेखत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाईफेक झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात आला असून या घटनेचा सीमाभागातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिस आयुक्तांची बोलती बंद
भ्याड हल्ला झालेल्या काही क्षणातच पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पत्रकारांना त्यांना घेराव घालून अनेक प्रश्नांचा भडीमार केला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱया पोलिसाकडून डोळेझाक केली जात असल्यामुळे असे प्रकार घडत आहे. हे पूर्णपणे पोलीस आयुक्तांचे अपशय असल्याचा आरोप यावेळी पत्रकारांनी केला असता पोलीस आयुक्तांची बोलती बंद झाली. आम्ही कायदेशीर मार्गाने हल्लेखोरांवर कारवाई करु, इतकेच सांगून त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
पोलीस स्थानकावर मोर्चा : पोलीस उपायुक्तांचीही उडाली दमछाक
शाईफेक करणाऱयांना पोलिसांनी अटक करुन कडक कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पायी मोर्चा काढण्यात आला. व्हॅक्सीन डेपो मैदानापासून ते टिळकवाडी पोलीस स्थानकापर्यंत हा मोर्चा निघाला. मात्र याला पोलिसांनी वेगवेगळय़ा मार्गाने आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. स्वतः पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकावर मोर्चा काढण्याचा ठाम विश्वास दाखविल्याने घोषणाबाजी न करता मोर्चा काढण्यास संमती देण्यात आली. मात्र पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच हा सारा प्रकार घडल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला.
शाईफेक झाल्याची माहिती सोशल मीडियावर पसरली आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मैदानाकडे जमू लागले. बघता बघता शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. यामुळे संपूर्ण परिसर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी दणाणून निघाला. पोलीस आयुक्तांकडून कार्यकर्त्यांना सूचना केल्या जात होत्या. परंतु कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जोवर शाईफेक करणाऱयांवर कारवाई होत नाही तोवर आमचे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशाराच कार्यकर्त्यांनी दिला.
मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी पायी मोर्चा काढत तक्रार दाखल करण्याचे सांगताच कार्यकर्ते, सभामंडपातून बाहेर पडले. परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवून काही मोजकेच कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी जातील, असा अट्टाहास धरला. यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची व धक्काबुकी झाली. शेवटी पोलिसांनी मोर्चा काढण्यास परवानगी दिली.
टिळकवाडी पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन
व्हॅक्सीनडेपोपासून टिळकवाडी पोलीस स्थानकापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनीही सहभाग घेतला. काही मोजक्मयाच कार्यकर्त्यांना पोलीस स्थानकामध्ये प्रवेश देण्यात आला. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले. प्रकरण चिघळू नये यासाठी पोलीस उपायुक्तांनी समिती नेते व कार्यकर्त्यांना दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे या प्रकरणावर काहीसा पडदा पडला आहे.
आज बेळगाव बंदची हाक
लोकशाही मार्गाने संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपल्या मागणीसाठी आंदोलन छेडत असताना मनपाच्या अधिकाऱयांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे मध्यवर्ती म. ए. समितीच्या अध्यक्षांना काळे फासण्यात आले. याच्या निषेधार्थ मंगळवार दि. 14 डिसेंबर रोजी बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. मराठी भाषिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.