शहर म. ए. समितीचे मराठी भाषिकांना आवाहन, कोल्हापूर येथील धरणे आंदोलनाला पाठिंबा
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागात मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक असतानाही त्यांना भाषिक अधिकारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजही मराठी भाषिकांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावरच्या लढाईसोबतच न्यायालयीन लढा द्यावा लागत आहे. त्यामुळे दि. 25 ऑक्टोबर रोजी होणारा महामोर्चा व 1 नोव्हेंबर रोजी निघणाऱया सायकल फेरीमध्ये मराठी भाषिकांनी विराट दर्शन घडवावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
शहर म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी जत्तीमठ येथे पार पडली. प्रास्ताविक करताना सरचिटणीस किरण गावडे म्हणाले, खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने शनिवार दि. 30 रोजी कोल्हापूर येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारला सीमावासियांच्या व्यथा समजाव्यात, या उद्देशाने कोल्हापूर येथे आंदोलन केले जाणार असून याला शहर म. ए. समितीचा पाठिंबा आहे. मोठय़ा संख्येने सीमावासियांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
आजवर मराठी भाषिकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात 1 नोव्हेंबर रोजी हरताळ पाळत सायकलफेरी काढली आहे. यावषीही मोठय़ा संख्येने मराठी भाषिकांनी सायकल फेरीमध्ये सहभागी व्हायचे आहे. तसेच दि. 25 रोजी होणाऱया महामोर्चामध्ये सहभागी होऊन भाषिक अल्पसंख्याक आयोगाने दिलेले अधिकार मिळण्यासाठी आंदोलन करावे, असे या बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, बसवंत हलगेकर, मनोहर हलगेकर, पियुष हावळ, आशुतोष कांबळे यांच्यासह शहर समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.