वाळवा / वार्ताहर
शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपणास माहीत आहे. परंतु महाराणी येसुबाई यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे कार्य केले आहे. तो इतिहास मागेच पडला आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतून त्यांचा इतिहास देखील पुढे आला असून, महाराणी येसाबाईंची भूमिका साकारण्याचे भाग्य आपणास लाभले. याचा मोठा मनस्वी आनंद आहे. असे प्रतिपादन स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केले. त्या वाळवा येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमांमध्ये बोलत होत्या.
हुतात्मा संकुल आणि वाळवा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या संभाजी महाराजांच्या निधनानंतर २९ वर्षे येसाबाई औरंगजेब यांच्या नजरकैदेत होत्या, त्यांना खूपच त्रास झाला. परंतु त्यांनी धीराने सामना दिला, मराठ्यांचे साम्राज्य अडचणीत आहे आणि बिकट परिस्थितीतून जात असताना येसाबाईंनी दाखवलेले धैर्य मोलाचे आहे.
आपल्या मुलाला गादीवर न बसवता, आपल्या पुतण्याला गादीवर बसवुन स्वराज्याचा कारभार त्यांनी चालवला, महाराजांचे साम्राज्य व भगवा त्यांनी डौलाने फडकवला, त्यासाठी त्यांनी जे जे केले ते सुवर्णाक्षरांनी लिहून घेण्यासारखे आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, लता पडळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केली, कु. स्वराली पाटील हिने छोटेसे मनोगत व्यक्त करून वाहवा मिळवली, यावेळी भाग्यवान दहा महिलांना गायकवाड आणि मान्यवरांच्या हस्ते पैठण्या भेट देण्यात आल्या, सौ. स्नेहल गौरव नायकवडी यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.
यावेळी प्राजक्ता गायकवाड यांनी येसुबाई यांनी दाखवलेल्या शस्त्र चालवणेची प्रात्यक्षिके दाखवुन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य व महिला व बालकल्याण माजी सभापती प्रा.डॉ. सुषमा नायकवडी, हुतात्मा बाजारच्या कार्यवाह नंदिनी वैभव नायकवडी, कवठेपिरानच्या सरपंच अनिता भिमराव माने, वाळव्याच्या सरपंच डॉ. शुभांगी अशोक माळी, त्याचबरोबर सांगली जिल्हा भाजपच्या सरचिटणीस सौ. लता अमोल पडळकर, वाळवा पंचायत समिती सदस्य वैशाली जाधव, पडवळवाडीच्या सरपंच प्रमिला जालिंदर यादव, शिरगावच्या सरपंच दिपाली शिंदे, कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित होत्या.