महाराष्ट्राने पार केला ५ कोटी लसीकरणाचा टप्पा
मुंबई/प्रतिनिधी
जगभरात साधारण गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातलेलं असताना कोरोना विषाणूपासून सुटका मिळवण्यासाठी सध्या लसीकरण मोहीम सुरु आहे. भारतातही कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने झाला. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. आता या लसीकरण मोहिमेने चांगलीच गती घेतली आहे. दरम्यान, महाराष्ट्राने लसीकरण मोहिमेत मोठी मजल मारली आहे.
महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा मोठा टप्पा आता गाठला आहे. राज्याने ५ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केला आहे. सोमवारी म्हणजे १६ ऑगस्टपर्यंत एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. मुंबईमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८३ लाख ८५ हजार १०६ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला तर त्या खालोखाल पुण्याचा नंबर लागतो. पुण्यात ६९ लाख ९० हजार ९४९ जननी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.