ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा अंकुशराव टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (दि.2) सायंकाळी 4 वाजता जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील पार्थपूर या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शारदा टोपे या शारदाताई कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. मागील महिनाभरापासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मार्च महिन्यातही त्या एक महिना ॲडमीट होत्या. मात्र, पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ॲडमीट करण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी मर्यादित उपस्थितीची जी नियमावली केली आहे, त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना संकटाची राज्याची जबाबदारी पार पाडत असताना सततच्या बैठका, दौरे यातूनही वेळ काढून राजेश टोपे रोज सकाळी आईची भेट घेऊन दिवसाची सुरुवात करायचे.