प्रतिनिधी / बेळगाव
अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आलेले सीमावासीय काळादिन पाळून आपला निषेध व्यक्त करीत असतात. सीमाभागाप्रमाणेच महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी काळादिन पाळावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पत्रांची मोहीम उघडण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व जे÷ आजी-माजी मंत्र्यांना पत्र पाठवून काळादिन पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सीमावासियांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी काळे कपडे, काळय़ा फिती बांधून आपला निषेध नोंदवावा, सीमावासीय आजही महाराष्ट्राकडे आशेच्या नजरेने पाहत असून, त्यांना बळ देण्याचे काम महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींनी करणे गरजेचे आहे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात येत आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, सीमासमन्वय मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आजी-माजी मंत्र्यांना पत्र पाठवून युवा समितीने हे आवाहन केले आहे.