ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्येत मागील काही दिवसांपासून घट होताना दिसत आहे. त्यानंतर राज्यात काही निर्बंधात सूट देत अनलॉक करण्यात आले. मात्र, त्यातच काल पहिल्यांदाच पुन्हा एकदा राज्यात रुग्ण संख्या वाढल्याचे समोर आले आहे. मागील 24 तासात 12 हजार नवीन कोरोनाबाधित आढळले असून तर 393 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची वाढती मृत संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनत चालला आहे.
राज्यात कालच्या दिवशी 11, 449 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आजपर्यंत एकूण 56 लाख 08 हजार 753 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.45 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.77 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,73,56,704 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,76,087 (15. 73 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10,76,165 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,384 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 60 हजार 693 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.