केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे प्रतिपादन, उद्धव ठाकरेंशी करणार चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना उद्रेकासंदर्भातील महाराष्ट्राची स्थिती अतिशय चिंताजनक आहे, अशी टिप्पणी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. लवकरच या संबंधी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत, असेही त्यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील 36 जिल्हय़ांपैकी 34 जिल्हय़ांमध्ये कोरोना पसरलेला आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या साधारणतः 10 टक्के आहे. मात्र कोरोनाबाधितांची संख्या या राज्यात 15 हजार 525 इतकी आहे. हे प्रमाण देशातील एकंदर संख्येच्या साधारण 30 टक्के इतके मोठे आहे. तर बरे होण्याचे प्रमाण देशाच्या संख्येच्या तुलनेत साधारणतः 22 टक्के आहे.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि ठाणे येथील परिस्थिती विशेष चिंताजनक आहे. मुंबईत बाधितांची संख्या 10 हजाराच्या आसपास तर पुण्यात 2000 हून अधिक आणि ठाण्यात 1 हजार 400 हून अधिक आहे. या तीन स्थानी मिळून जवळपास साडेतेरा हजार बाधित आहेत. मृत्यूंची संख्याही महाराष्ट्रात जास्त आहे. रूग्णांपैकी मृत्यू होणाऱयांचे प्रमाण देशात 3.3 टक्के तर महाराष्ट्रात ते 4.4 टक्के आहे.
मुंबईवर अधिक लक्ष द्या
महाराष्ट्र सरकारने मुंबईवर जास्त लक्ष द्यावे, अशी सूचना केंद्र सरकारने केल्याचेही वृत्त आहे. मुंबईतील धारावीची झोपडपट्टी हा सर्वात धोकादायक प्रदेश बनला असून येथील मृत्यूंची संख्या मुंबईत सर्वाधिक आहे. धारावी हा भाग जगातील सर्वात जास्त दाटीवाटीचा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे शारिरीक अंतर राखणे अतिशय अवघड आहे. त्यामुळे ते जास्त काळजीचे कारण आहे.
हर्षवर्धन यांचा इशाऱयामुळे काय होणार…
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रासंबंधी व्यक्त केलेल्या चिंतेचे अनेक परिणाम संभवू शकतात. याचे राजकीय पडसादही उमटू शकतात. महाराष्ट्रात कोरोनावरून अनेकदा राजकीय वार-प्रतिवार झालेले आहेत. आता येथील परिस्थितीची गंभीर दखल केंद्र सरकारनेच घेतल्याने राज्य सरकारला तातडीने पावले उचलावी लागतील असे मत व्यक्त होत आहे.