- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील डेल्टा प्लस या कोरोना व्हेरिएंटने बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, राज्यातील डेल्टा प्लस रुग्णांची संख्या आता 21 वरून 45 वर पोहोचली आहे.
आतापर्यंत राज्यात आढळलेल्या 45 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 27 पुरुष असून 18 स्त्रिया आहेत. सर्वाधिक 20 डेल्टा प्लस रुग्ण 19 ते 45 वर्ष वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल 46 ते 60 वर्ष वयोगटातील 14 रुग्ण आहेत. यामध्ये 18 वर्षांखालील 6 बालके असून 60 वर्षांवरील 5 रुग्ण आहेत. 45 रुग्णांपैकी 34 रुग्णांची माहिती राज्य सरकारला मिळाली असून रत्नागिरीतील एक मृत्यु वगळता डेल्टा प्लस रुग्णांमधील आजाराचे स्वरुप सौम्य ते मध्यम स्वरुपाचे असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
संभाव्य कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस वर्तवण्यात आली आहे. ती येण्यापूर्वीच डेल्टा प्लसचे नवीन रुग्ण राज्यात आढळून येत आहेत.
दरम्यान, ‘संबंधित रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिलेले असून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार केले जाणार असल्याने कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याचे कारण नाही,’ असे आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं आहे.
मुंबई, रत्नागिरी, ठाणे, जळगाव आणि पुणे येथे रूग्णसंख्या जास्त आहे. तसेच मराठवाड्यात औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला असल्याचे टोपेंनी सांगितले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने घेतले जात असून प्रयोगशाळेत त्या नमुन्यांची जिनोमिक सिक्वेन्सीकच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान ही रुग्ण संख्या वाढल्याचे टोपे यांनी सांगितले.
डेल्टा प्लस रुग्णांची प्रवासाची पार्श्वभूमी तपासली जात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा देखील शोध घेतला जात आहे. सध्या राज्यातील करोना रुग्णसंख्या स्थिर असून दररोज साडेपाच हजारांपासून 7 ते 8 हजारापर्यंत रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. ज्या जिल्ह्यात निर्बंध अजूनही कायम आहे तेथील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.