ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची संभाव्य चर्चा सुरू आहे. त्यातच जर धोका नसेल तर निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेसंबंधी महत्त्वाचे विधान केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, जुलै ते सप्टेंबर दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणार, असे अंदाज वर्तविला जात आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार ते सांगता येत नाही. पण जर आपण कोरोनाचे नियम व्यवस्थित पाळले, कोविडपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली तर आपल्याला कोरोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. तसेच यावर लसीकरण हा सुद्धा रामबाण उपाय असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले आहे.
यासोबतच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी व त्यांच्यावरील अन्य निर्बंध उठवावेत, अशी एक मागणी होत आहे. यावर बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारच्या पातळीवरही याबाबत चर्चा सुरू आहे. जसजसे लसीकरण होत आहे, तसतसे निर्बंध शिथील करण्याची राज्य सरकारची भूमिका आहेच. अजिबात निर्बंध उठत नाहीत असे नाही आहे. पूर्वी विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह नसेल तर त्यांना प्रवेश मिळायचा नाही. अशा प्रवाशांना थेट विलगीकरण केले जायचे. आता तसे होत नाही. लसीचे दोन डोस घेतले असतील तर त्याला प्रवेश दिला जात आहे.
- … त्यामुळे अद्याप निर्णय झाला नाही
पुढे ते म्हणाले, लोकलच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता प्रत्येक प्रवाशाला थांबवून त्यांच्याकडील लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी करता येईल का? रेल्वेकडे तितके मनुष्यबळ आहे का? हे प्रश्न आहेत. त्यामुळे अद्याप काही निर्णय झालेले नाहीत. मात्र, दोन लस झालेल्यांवरील काही निर्बंध शिथील करायला हवेत, याबाबत कुणाचेही दुमत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कोविड टास्क फोर्स लवकरच या संदर्भात निर्णय घेतील, असे टोपे यांनी सांगितले.