ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील बंद असलेली महाविद्यालये पुन्हा एकदा सुरु होणार आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली.
ते म्हणाले, 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालयं विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोना संकट पाहता विद्यार्थ्यांना तूर्तास 75 टक्के सक्तीच्या उपस्थितीची अट बंधनकारक नसणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, महाविद्यालये सुरु करत असताना एक महत्त्वाची भूमीका विद्यापिठांची किंवा खाजगी विद्यापिठांची असली पाहिजे. यूजीसीने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या वर्गांची संख्या, त्यामध्ये किती विद्यार्थी बसण्याची व्यवस्था आहे. त्या बसण्याच्या व्यवस्थेच्या 50 टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या संख्येसह महाविद्यालये सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. म्हणजेच, 50 टक्के उपस्थितीसह महाविद्यालये सुरु केली जातील.
महाविद्यालये सुरु होत असताना वसतीगृहांचा जो प्रश्न आहे. तो टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचे अधिकार विद्यापिठांकडे देण्यात आले आहेत. पण सध्या 15 फेब्रुवारी रोजी सुरु होताना फक्त कॉलेज सुरु होतील, असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.