ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याबाबतची घोषणा केली. त्यामुुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेेंना दिलासा मिळाला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या मागणीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक झाली. या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून 27 मे पर्यंत निवडणूका घेण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीखही जाहीर केली. 21 मे रोजी मुंबई ही निवडणूक होईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद अधांतरीत आहे. मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यपद आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी म्हणून राज्य मंत्रिमंडळाने दोन वेळा शिफारस केली होती. मात्र, राज्यपालांनी तीन आठवडे या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नाही. अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केली.