दासबोधात समर्थ रामदास स्वामीं म्हणतात, ‘राजकारण बहुत करावे । परंतु कळोच नेदावे । परपीडेवरी नसावे । अंतरूकरण ।।’ राजकारणाच्या डावपेचांचे जनसामान्यांना कायमच आकर्षण अन् अप्रूप असते. गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणातले हे शह-काटशह लवकरच भाडिपाच्या डिजिटल मंचावर दिसणार आहेत.
जसे 2020 हे वर्ष बहुतांश लोकांसाठी गदारोळ निर्माण करणारे ठरत आहे, तसेच 2019 मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात चर्चित वादग्रस्त आणि अनपेक्षित निवडणूक पार पडली. या निवडणुकीची रोमांचित करणारी कहाणी पत्रकार कमलेश सुतार यांनी 36 डेज या आपल्या पुस्तकातून वाचकांच्या भेटीला आणली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी पक्षांनी केलेले खटाटोप आणि राजकीय राजनीतींचे डावपेच याचा सविस्तर वफत्तांत या पुस्तकात मांडण्यात आला आहे. भारतीय डिजिटल पार्टी म्हणजे ‘भाडिपा’ने डिजिटल पडद्यावर रुपांतर करण्यासाठीचे हक्क मिळविले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणी आणि नेत्यांसोबत टाऊन हॉल सिरीज लोकमंचच्या माध्यमातून जवळून संवाद साधल्यानंतर आम्ही सर्वजण या निवडणुकीमध्ये मागे घडलेल्या रंजक प्रसंगाबद्दल खूपच उत्सुक होतो. 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही आपल्या पिढीने पाहिलेली सर्वात रोमांचक निवडणूक ठरली. यात कोणीही नायक, खलनायक किंवा चांगलं-वाईट असं नव्हतं. आम्हाला ही कथा जशी घडली आहे तशीच सांगायची आहे यात विजय तेंडुलकरांच्या सिंहासनसारखा ड्रामा आहे तसेच कथा नेटफ्लिक्सवरील हाऊस ऑफ कार्ड्ससारखी उलगडते असं सांगत हा एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास भाडिपा तसेच गुलबदन टॉकीज प्रायव्हेट लिमिटेडचे उपसंस्थापक व क्रिएटिव्ह दिग्दर्शक सारंग साठय़े यांनी व्यक्त केला. ‘भाडिपा’ने याआधी निर्मित केलेल्या पांडू आणि वन्स अ इयर या दोन्ही वेब सिरीज गाजल्या. निवडणुकीच्या 36 दिवसात नेमकी राजकीय समीकरणे कशी बदलली याचा केवळ आढावा न घेता मनोभावनांच्या आविष्काराचे चित्रण असलेले हे 36 डेज हे पुस्तक आता डिजिटल नाटय़रुपात येणार असल्याचा आनंद पत्रकार कमलेश सुतार यांनी व्यक्त केला.