खानापूर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / खानापूर
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी पक्षभेद बाजूला ठेवून सीमाप्रश्नी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना भेटून सीमाप्रश्नाबाबत आग्रही भूमिका घेण्याचा निर्णय खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत घेतला. अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष व माजी आमदार दिगंबर पाटील होते.
दिगंबर पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना सीमाप्रश्नाची सत्य परिस्थिती कळणे गरजेचे आहे. महाराष्ट्रावर झालेला अन्याय व कर्नाटकाच्या जोखडात मराठी भाषिकांची होत असलेली घुसमट केंद्र सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी एकजुटीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. कर्नाटकातील लोकप्रतिनिधी सीमाप्रश्नाबाबत मतभेद विसरून एक होतात. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींकडूनही सीमाप्रश्नी एकजुटीची अपेक्षा आहे.
कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे म्हणाले, महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या खासदारांची नुकतीच प्रत्यक्ष भेट घेऊन पंतप्रधान व गृहमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांनी 1993 साली सूचविलेल्या तोडग्यानुसार सीमाप्रश्न तातडीने निकालात काढावा, अशी मागणी केली जाणार आहे. यावेळी भू-विकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, सचिव आबासाहेब दळवी, महादेव घाडी, प्रकाश चव्हाण, विवेक गिरी यांनी आपले विचार मांडले.
मध्यवर्ती म. ए. समितीचे माजी अध्यक्ष दिवंगत वसंतराव पाटील यांच्या पत्नी सरोजनी पाटील व सीमालढय़ातील दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली..बैठकीला शिवाजी पाटील, मरू पाटील, देवाप्पा भोसले, नारायण पाटील, नारायण कापोलकर, दीपक लाड, रुक्माण्णा झुंजवाडकर, दीपक देसाई, वसंत नावलकर, भैरू कुंभार, डॉ. एल. एच. पाटील, रमेश देसाई आदी उपस्थित होते.