प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी परराज्यातून येणाऱयांना यापूर्वी चौदा दिवस संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवले जात होते. आता केवळ महाराष्ट्रातून येणाऱयांसाठी सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन सक्तीचे असणार आहे. उर्वरित सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकातील वेगवेगळय़ा जिल्हय़ात आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने क्वारंटाईनच्या नियमात बदल केला आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांतून येणाऱया चाकरमान्यांसाठी संस्थात्मकऐवजी चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन असणार आहे.
सरकारने जारी केलेल्या नव्या नियमानुसार कर्नाटकात कामानिमित्त दोन दिवसांसाठी (48 तास) येणाऱयांना क्वारंटाईन आणि कोरोना तपासणीची सक्ती असणार नाही. विमान, रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीने केवळ 48 तासांसाठी येणाऱयांना काही सूट देण्यात आली असून त्यासाठी संबंधितांना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
परराज्यांतून आलेल्यांचा मुक्काम जर अल्पकाळाचा असेल तर त्या वेळेत त्यांची स्वॅब तपासणी होणार आहे. दोन दिवसांहून अधिक व सात दिवसांपेक्षा कमी मुक्काम असणाऱयांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. अहवाल येईपर्यंत त्यांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. जर अहवाल निगेटिव्ह आले तर त्यांना आपल्या गावी परतता येणार आहे. परराज्यातून येणाऱयांसाठी प्रवासाच्या दोन दिवस अगोदर कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र असेल तर अशा प्रवाशांची पुन्हा तपासणी होणार नाही. त्यांना क्वारंटाईनचे नियमही लागू असणार नाहीत.