- सोमवारपासून होणार अंमलबजावणी
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात अनलॉकबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर संपला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने 4 जूनच्या मध्यरात्री महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूचना जारी केली आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. यात पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या आणि 25 टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड व्यापले आहेत असे जिल्हे निर्बंधमुक्त राहणार आहेत. तर 5 टक्के पॉझिटिव्हिटी दर व 25 ते 40 टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, दर गुरुवारी निश्चित निकषानुसार स्थिती आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येणार असून त्याआधारावर कुठे निर्बंध कमी करायचे आणि कुठे वाढवायचे याबाबतचा नवा आदेश लागू केला जाणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून केली जाणार आहे, असे देखील नमूद करण्यात आले आहे.
या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.
असे आहेत पाच टप्पे :
पहिला टप्पा : कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5 टक्के आणि 25 टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे.औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.
दुसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी दर 5 टक्के आणि 25 ते 40 टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत असे जिल्हे.अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.
तिसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्के किंवा 40 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापले आहेत असे जिल्हे.अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
चौथा टप्पा : पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे.पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
पाचवा टप्पा : पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा अधिक किंवा 75 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापले आहेत असे जिल्हे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे. वरील 4 टप्प्यांमध्ये नसलेल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश पाचव्या टप्प्यातील गटात करण्यात आला आहे.
कुठे काय सुरू होणार ?
पहिला गट : या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू होणार. रेस्तराँ सुरू करण्यासाठीही परवानगी. लॉकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही 100 टक्के कर्मचारी क्षमतेनं सुरू राहतील. विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल करण्यात आली आहे. या भागात जमावबंदीही नसणार आहे.
दुसरा गट : या गटात जे जिल्हे असतील तिथे सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंटसाठीही 50 टक्के क्षमतेने परवानगी. लॉकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही 100 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 अशी वेळ राहील. चित्रीकरण नियमितपणे करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना 50 टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा 100 टक्के क्षमतेने सुरू होईल. आसन क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. या भागात जमावबंदी लागू असेल.
तिसरा गट : यामध्ये सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्यास मुभा असेल. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर वीकेंडला बंद राहतील.
चौथा गट : यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर ५व्या गटातमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील तर वीकेंडला मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील. 3, 4, आणि 5 या स्तरांतील भागात इतरही अनेक निर्बंध कायम राहणार आहेत.