ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आज सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने या अनलॉकसाठीचे नियम व निकष हे शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केले होते. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानंतर मुंबई, नागपूर, ठाणे आणि अनेक महत्वाच्या शहरांमध्ये महापालिका प्रशासनाने अनलॉकची नियमावली जाहीर केली आहे.
या आदेशाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित केले. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होण्यास सुरुवात होत आहे.
पहिला स्तर : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड 25% पेक्षा कमी भरलेले आहेत. या टप्प्यात सर्व व्यवहार खुले करण्यात येतील.
दुसरा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट 5% आणि ऑक्सिजन बेड 25% ते 40% भरलेले आहेत, असे जिल्हे.
तिसरा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट 5% ते 10% आणि ऑक्सिजन बेड 40% हून अधिक भरलेले आहेत. याठिकाणी व्यवहार सायंकाळी 5 वाजता बंद होतील.
चौथा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट 10% ते 20% आणि ऑक्सिजन बेड 60% असलेले जिल्हे. सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील.
पाचवा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्याहून अधिक आणि 75% टक्क्याहून अधिक ऑक्सिजन बेड भरलेले जिल्हे.
मुंबईत बेस्ट सुरू
त्याअंतर्गत मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मुंबईत आजपासून बेस्टची वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने सुरू होणार आहे. मात्र प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. ब्रेक द चेन अंतर्गत सरकारनं बेस्ट उपक्रमाला मान्यता दिली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाकडून अधिकाधिक बसगाड्या चालवल्या जाणार आहेत. मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- पुण्यात पीएमपी बस धावणार
पुणे शहरात आजपासून 179 मार्गांवर 416 सिटी बसेस एकूण आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने धावणार आहेत. मात्र, प्रवाश्यांना प्रवास करताना मास्क परिधान करणे आवश्यक आहे. या सोबतच शहरातील सर्व दुकाने, हॉटेल्स 4 वाजेपर्यंत सुरू असतील. तर उद्याने, जिम, सलून देखील सुरू करण्यात आली आहेत. पुणेकर पहिल्याच दिवशी जिममध्ये व्यायाम करत, तसेच मॉर्निंग वॉक करत आनंद घेताना दिसले.
- सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत; काळजी घ्या : मुख्यमंत्री
कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ‘ब्रेक दि चेन’मध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले आहेत.