ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच जाते आहे. रुग्ण संख्या वाढल्यानंतर आणि आवाहन करुन देखील लोकांची गर्दी कमी होत नाही, हे लक्षात आल्यानंतर ठाकरे सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध अधिक कडक केले असून हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील आदेश सरकारकडून जारी करण्यात आला आहे.
नव्या नियमानुसार आज पासूनच (27 मार्च मध्यरात्रीपासून) हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. त्यानुसार आज रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान जमावबंदी असणार आहे. पाच जणांपेक्षा अधिक माणसांनी एकत्र बाहेर पडण्यावर बंदी असणार आहे.
तसेच मास्क न लावल्यास, रस्त्यावर थुंकल्यास, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यास तातडीने दंड करण्यात येईल. या कुठल्याही नियमाचे पालन न करणाऱ्यांना जागच्या जागी दंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड आकारण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.
आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत.
होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचे बंधन असणार आहे. मात्र, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. घालून दिलेल्या नियमांचे हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.