ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 1 लाख 41हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्रात लॉक डाऊनच्या सुरुवातीपासून म्हणजेच 22 मार्च ते 2जुलै या 1,41,258 गुन्ह्यांची नोंद झाली असून 29,559 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 12 कोटी 25 लाख 11 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर अत्यावश्यक सेवेसाठी 5 लाख 48 हजार 005 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
पुढे ते म्हणाले, लॉक डाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 292 घटना घडल्या. यामध्ये 861 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असून आतापर्यंत या नंबरवर 1,05,577 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1335 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 86,663 वाहने जप्त करण्यात आली.
कोरोना विरुद्धच्या या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित असून प्रत्येकावर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी यावेळी केले.