ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. मागील चोवीस तासात 2598 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 59 हजार 546 वर पोहचली आहे. तर कालच्या दिवसात 698 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आता पर्यंत एकूण 18 हजार 616 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
गुरुवारी दिवसभरात 85 रुग्णांचा मृत्यू झाला असून आता पर्यंत 1982 जणांनी जीव गमावला आहे,राज्यात सध्या 38 हजार 939 रुग्ण उपचार घेत आहेत.
काल दिवसभरात झालेल्या 85 मृत्यूमध्ये सर्वाधिक मुंबईत 38, ठाणे 4, वसई – विरार 4, नवी मुंबई 2, जळगाव, नांदेड, रायगड प्रत्येकी एक, पुणे 10, सातारा 9, सोलापूर मनपा भागात 7, औरंगाबाद 3, अकोला मधील 5 जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये 60 पुरुष आणि 25 महिला रुग्ण आहेत.
महाराष्ट्र राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31.26 टक्के एवढे आहे. सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 745 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 122 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर आता पर्यंत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 4 लाख 19 हजार 417 नमुन्यांपैकी 59 हजार 546 जण पॉझिटिव आहेत.