ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात सर्वाधिक म्हणजेच 3752 नविन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 20 हजार 504 झाली आहे. यापैकी बरे झालेले रुग्ण वजा केल्यास सध्या महाराष्ट्रात 53 हजार 901 उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात 100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण बळींचा आकडा 5751 वर जावून पोहचला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली.
पुढे ते म्हणाले, कालच्या एका दिवसात 1 हजार 672 जण कोरोनामुक्त झाले असून आता पर्यंत 60 हजार 838 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ते सध्या 50.49 टक्के आहे. तर मृत्युदर 4.77 टक्के इतका आहे. राज्यात काल झालेल्या 100 मृत्यू मध्ये मुंबईत 67 ठाणे 4, भिवंडी 27, वसई विरार 1 आणि नागपूर मनपा येथील एका रुग्णांचा समावेश आहे. एकूण 100 मृत्यूंमध्ये 66 पुरुष आणि 44 महिला आहेत.
महाराष्ट्रात सध्या 5 लाख 81 हजार 650 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 26 हजार 740 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज पर्यंत पाठवण्यात आलेल्या 7 लाख 17 हजार 683 नमुन्यांपैकी 1 लाख 20 हजार 504 जण पॉझिटिव्ह आले आहेत.